Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई
Maratha Reservation: सातारा गॅझेटियर लागू करा, सरकारने फसवणूक थांबवावी; पाटण मराठा सेवकांचा एल्गार
शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेलाही फटका बसला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा तसेच काही खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक आणि पर्यटक उत्तन, गोराई, वेलंकणी, धारावी मंदिर परिसर तसेच इतर समुद्रकिनारी पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणावर जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. समुद्रात भरतीच्या वेळी साडेचार फूटांपर्यंत उंच लाटा उसळत असल्याने या ठिकाणी कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. याशिवाय मुसळधार पावसामुळे डोंगराळ आणि जंगल परिसरात दरडी कोसळणे, झाडे पडणे किंवा पाण्याचा वेग अचानक वाढण्याचा धोका देखील कायम आहे.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य राबविणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने उत्तन समुद्रकिनारा, गोराई समुद्रकिनारा, वेलंकणी चर्च परिसर, धारावी मंदिर परिसर तसेच शहरातील इतर पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी लागू केली आहे.
या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मिरा-भाईंदर पोलीसांनी शहरातील प्रमुख चौक, समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे मार्ग तसेच पर्यटनस्थळांच्या प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पर्यटकांना तेथे जाण्यापासून रोखले जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने घरी परतण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणीही केली जात आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या, बंदी असतानाही समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील
दरम्यान, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस प्रशासन सतर्क असून शहरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे, नाले आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून सुरक्षिततेलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






