शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; मार्च, एप्रिल महिन्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त
मार्च व एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी व गारपिटीचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला व अन्य फळबागा मातीमोल झाल्या आहेत. तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषतः सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा कहर पाहायला मिळाला असून मोठे नुकसान झाले आहे.
मार्च व एप्रिल ७ महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहे. दोन्हीही महिन्यातील नुकसानीचे पंचनामे एकत्रितरित्या सुरु करण्यात येत असून पुढील तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र माने यांनी दिली.
शेतमालाला भाव नाही. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी भरून निघेल,अशी प्रतिक्रिया जय किसान फार्मर्स फोरम विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहरकर यांनी दिली.
मार्च, एप्रिलमध्ये ८७ गारपीट झाला पीक काढणीच्या हंगामात अवकाळीने नुकसान झाले. शासनाने कर्जमाफीच्या धोरणांमध्ये गारपीट व अवकाळीग्रस्त शेतक-यांसाठी विशेष पॅकेजची व्यवस्था करणे आवश्यक आहे, अशी माहिती सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कमिटी सचिन होळकर यांनी दिली.
पिकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
कांदा – ४४,७०१
डाळिंब – ४,८४७.५०
गहू – ३,२८०.३५
भाजीपाला – १,१८६.३५
द्राक्ष -९०२
मका – ८६९
कांदा रोप -५३.५०
टोमॅटो -३५.४०
पेरू -०.५२
आंबा – 0.५५






