८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार
पावसाळ्याच्या काळात पशुधनामध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ६८ हजार पशुधनाला प्रतिबंधात्मक लसीकरणाचे कवच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून १६ लाख २८ लाख २४४ लशींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून अनेक पशुधनाला आजपर्यंत लसीकरण करण्यात आले.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. वेळेवर उपचार न झाल्यास या आजारांमुळे जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो. यंदा पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व राबविलेल्या लसीकरण मोहिमेमुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पशुंमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात टळल्याचे चित्र आहे. मोठ्या संख्येने पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वेळेत लसीकरण करून घेतल्याने घटसर्प, फऱ्या आणि आंत्रविकार यांसारख्या जीवघेण्या आजारांवर प्रभावी प्रतिबंध घालण्यात यश आले.
जिल्ह्यात आजघडीला गोवंशवर्गीय ८ लाख ६८ हजार २८१ पशुधन आहेत. यासह म्हैसवर्गीय ५६ हजार ८४४, शेळ्या ३ लाख ४८ हजार ३४४, तर मेंढ्या ४१ हजार ९२८ असे एकूण ८ लाख ६८ हजार २८१ पशुधन आहे. पावसाळ्याच्या दिवसात खासकरून झडीमध्ये जनावरांना विविध आजाराची लागत होते. यात घटसर्प, एकटांग्या आणि आंत्रविकार, फऱ्या यासह शेळ्यांमधील गोट पॉक्ससारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. या आजारांमुळे पशुधनाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले.
यावेळच्या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजीटल ट्रॅकिंग होय. यात प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल टाइम (तत्काळ) करणे आवश्यक होते. पशुधनाचे टॅगिंग करूनच ही नोंदणी केली जात होती. त्यामुळे मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवण्यात व बोगस नोंदींना आळा बसण्यास मदत झाली.






