बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीला हातभार लावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी रडारवर घेण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर प्रत्येक पोलिस ठाण्याने कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक शहरातंर्गत रस्त्यावर वळवण्यात आली आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक नियमांकडे कानाडोळा करीत रस्त्यावर
वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करताना बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. पण, पार्किंगबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कर्णिक यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांपासून कलम २८५ नुसार शेकडो गुन्हे दाखल झालेत. मात्र, त्याची व्याप्ती ठराविक पोलिस ठाण्यांपुरती मर्यादीत आहे. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी प्रत्येकी किमान पाच गुन्हे दाखल करावेत, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. शहरातंर्गत बेशिस्त वाहतुकीला लगाम बसल्यास कोंडी होणार नाही.
जानेवारी महिन्यात वाहतूक पोलिसानी तब्बल ११ हजार ६०८ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत ७७ लाख ६१ हजार १५० रूपयांचा दंड ठोठावला. प्रादेशीक परिवहन विभाग आणि पोलिसांनी ४६२ रिक्षांवर कारवाई केली. त्यातील ३५ रिक्षा स्क्रैप करण्यात आल्यात. याच महिन्यात ९४ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यात ७ लाख ५१ हजार रूपये दंड वसूल झाला.
ट्रिपल सीट- १३४७
गणवेश नसणे (रिक्षा) – ६९२
राँग साईड- १२७३
रहदारीस अडथळा- २२८५
फट सीट रीक्षा-७६१
सिग्नल जंप – १९०७
काळी काच – ४३५
परवाना वा परमीट नसणे- ६०१
जादा प्रवासी रीक्षा- १४२
मोबाईलवर बोलणे- ३३३
विना नंबर/फॅन्सीनंबर- ४३२
सीटबेल्ट वापर नसणे – ४८५
बुलेट आवाज – १५
रिक्षा बॅज नसणे- ७७६
इतर केसेस- २८
एकूण दंड- ७७,६१,१५०






