Mumbai News: पावसाळ्यापूर्वी २६ हजार झाडांची छाटणी! ७ जूनपर्यंत वृक्षछाटणी करण्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य
मुंबईत पावसाळ्यात झाडे कोसळून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडून आतापर्यंत मुंबईतील २६,६७२ झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणी आणि मृत झाडे हटवण्याची प्रक्रिया येत्या ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे असल्याची माहिती उद्यान विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)
मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या विशेष सर्वेक्षणात मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या एकूण १.९०.२९६ झाडांची पाहणी केली. यामध्ये ५१३ झाडे अत्यंत धोकादायक किंवा मृत अवस्थेत असल्याचे समोर आले होते. त्यापैकी आतापर्यंत २९६ झाडे पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत, तर यंदा पालिकेकडून खासगी संस्था आणि रेल्वे परिसरातील झाडांबाबतही खबरदारी घेतली जात आहे. खाजगी आवारातील झाडे आणि त्यांच्या झुकलेल्या फांद्यासाठी पालिकेने आतापर्यंत ७,९७८ सोसायट्या आणि मालकांना नोटिसा बजावल्या आहेत, तसेच, रेल्वे मार्गावरील झाडांच्या छाटणीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ३४ अर्ज प्राप्त झाले असून, त्याबाबत तांत्रिक मंजुरी आणि कार्यवाही सुरू आहे.
मुंबईत साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते. हे लक्षात घेऊन पालिकेने १५ मे पर्यंत सर्वेक्षणाचे सर्व काम पूर्ण करण्याचे आणि ७ जूनपर्यंत प्रत्यक्ष छाटणीचे काम आटोपण्याचे नियोजन केले आहे.विविध वॉर्डामध्ये कंत्राटदारांमार्फत ही कामे सुरू असून, आयुक्तांकडून या कामाचा नियमित आढावा घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पावसाळ्यात झाडे पडण्याची भीती असल्यास किंवा एखादी फादी धोकादायक वाटत असल्यास नागरिकानी तत्काळ संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान विभागामार्फत करण्यात आले आहे.






