२० बिबट्यांचे जामनगर येथील ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर (फोटो- सोशल मीडिया)
२० बिबट्यांना गुजरातमधील जामनगरला नेले जाणार
बिबट्यांकडून मानवांवर होणाऱ्या हल्ल्यांत लक्षणीय वाढ
शनिवारी पार पडली यशस्वी प्रक्रिया
पुणे: जुन्नर वनविभागातील मानव – बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील २० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील ‘ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (वनतारा)’ येथे स्थलांतरित करण्यात आले. शनिवारी (७ मार्च) ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
गेल्या दहा वर्षांत जुन्नर वनविभागात बिबट्यांकडून मानवांवर होणाऱ्या हल्ल्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः जुन्नर आणि शिरूर परिसरातील अतिसंवेदनशील भागांत मानव व पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर संरक्षित केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ‘वनतारा’ केंद्रात ५० बिबट्यांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी वनतारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील २५ सदस्यीय पथक जुन्नर येथे दाखल झाले.
शनिवारी डॉ. जितेंद्र रामगावकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम प्रदेश आणि आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० पैकी पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना (१० नर व १० मादी) वातानुकूलित व सुसज्ज रेस्क्यू व्हॅनमधून सुरक्षितपणे जामनगरकडे रवाना करण्यात आले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक लोकेश पाटील, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चैतन्य कांबळे तसेच वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी–कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान सर्व आवश्यक पशुवैद्यकीय आणि तांत्रिक खबरदारी घेण्यात आली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना राबवत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…
Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सोमवारी रात्री सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला. या हल्ल्यात स्थानिक शेतकरी प्रदीप पवार यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सैतवडा आसपासच्या वाड्यांमध्ये आणि बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे.






