सौजन्य - नवराष्ट्र टीम
हवामानातील अचानक बदलांमुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने अनेकांना पशुवैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. परिणामी औषधोपचार, इंजेक्शन आणि पशुवैद्यकीय तपासणीसाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे.
सध्याच्या बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये ताप, सर्दी व पचनाचे विकार वाढत आहेत. शेतकऱ्यांनी गोठे कोरडे ठेवून स्वच्छता राखावी, नियमित लसीकरण करावे आणि लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा. -डॉ. विजय साळुंखे, आळंदी
ग्रामीण भागात काही ठिकाणी गोठ्यांची योग्य व्यवस्था नसल्याने आणि तापमानातील तीव्र चढउतारामुळे जनावरांना त्रास होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोठ्यात स्वच्छता ठेवणे, कोरडी जागा उपलब्ध करून देणे, वेळेवर लसीकरण करणे आणि जनावरांना सकस आहार देणे आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन पशुवैद्यकीय विभागाने गावपातळीवर जनजागृती आणि आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत.
दिवसा उष्णता आणि रात्री थंडीमुळे जनावरांवर ताण येतो. संतुलित आहार, स्वच्छ पाणी आणि योग्य निवारा आणि दूध कांडी पावडर शरीर बळकटीसाठी दिल्यास आजारांचे प्रमाण कमी होते. शेतकऱ्यांनी स्वतः उपचार न करता तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत. -डॉ. अनिल डांगे, राजगुरुनगर






