नांदेड वाघाळा महानगरपालिका महापौर कविता मुळे यांनी सकाळी दौरा करत सूचना दिल्या (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड नवनिर्वाचित महापौर कविताळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रशासनाला सज्ज केले. शहरवासिय साखर झोपेत असताना पहाटेच शहरातील विविध भागांना भेट देत त्यांनी स्वच्छता मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
महापौर कविता मुळे यांनी राज कॉर्नर, चैतन्य नगर एअरपोर्ट रोड, नमस्कार चौक, रेल्वे स्टेशन परिसर आणि बस स्टैंड परिसरात स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये कचरा संकलनाची स्थिती तपासून त्यांनी कामात कसूर आढळल्यास दंडात्मक कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. एअरपोर्ट रोडवरील उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि परिसरातील सुविधांबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. ‘घंटागाडी’ च्या वेळापत्रक आणि नियमिततेबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले.
हे देखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका
नांदेडमध्ये इंदौरच्या धर्तीवर व्यापक स्वच्छता अभियान
यावेळी महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, स्वच्छता अधिकारी बालाजी देसाई, स्वच्छता निरीक्षक किशन, तारू प्रियंका एंगडे तसेच संबंधित कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. इंदौर च्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छतेचा व्यापक आणि शाश्वत उपक्रम राबविण्यात येणार आहे. कचरा डेपोवरील प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे, सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि कचरा
संकलन यंत्रणा मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित नांदेड हे आपले मुख्य ध्येय असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि शुद्ध पाणीपुरवठा यांना प्राधान्य दिले जाईल,” असे स्पष्ट करत महापौर कविता मुळे यांनी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
हे देखील वाचा : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा
आसाराम लोमटे यांचे द्विदिवसीय विचारमंथन
नांदेडच्या वैचारिक परंपरेला बळकटी देणारी ४४ वी नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला यंदा २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व रूपवेध ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या व्याख्यानमालेत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक डॉ. आसाराम लोमटे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. परभणी येथे पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. लोमटे यांनी कथा, कादंबरी व वैचारिक लेखनातून ग्रामीण वास्तव आणि सामाजिक प्रश्नांना प्रभावी शब्द दिले आहेत. ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी त्यांना २०१६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लेखनात मानवी वेदना, कृषीजीवन आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दिसते. दि. २३ फेब्रुवारी रोजी ‘समाज, साहित्य आणि संवेदनशीलता’ तर दि. २४ फेब्रुवारी रोजी ‘भारतीय साहित्य व साहित्यातील भारतीयता’ या विषयांवर ते व्याख्यान देणार आहेत. सायन्स कॉलेजच्या पूरणमल लाहोटी सभागृहात सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होणार असून साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






