संग्रहित फोटो
ओतूर/ मनोहर हिंगणे : देशभरात सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा मोठा भडका आता जुन्नर तालुक्यात उडाला आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बळीराजा आणि व्यापारी वर्गाचे या इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला असून, याचा थेट परिणाम म्हणून जुन्नर तालुक्यातील मालवाहतूक वाहन व्यावसायिक संघटनेने वाहतूक भाड्यात १५ ते २० टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाहन चालकांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी, किरकोळ व ठोक व्यापारी आणि पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा या प्रमुख व्यापारी बाजारपेठांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जुन्नर तालुका हा प्रामुख्याने भाजीपाला, टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादनात अग्रेसर मानला जातो. येथील जुन्नर ओतूर, आणि नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दररोज शेकडो टन भाजीपाला मुंबई (वाशी), पुणे आणि परराज्यांतील बाजारपेठांमध्ये रवाना होत असतो. मात्र, डिझेलच्या दराने शंभरी पार करून नवा उच्चांक गाठल्याने वाहतूकदारांनी भाडेवाढ लागू केली आहे. खते, बियाणे, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेती आधीच तोट्यात चालली आहे. त्यात आता वाहतूक भाडे वाढल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च दुप्पट झाला आहे. अनेकदा बाजारपेठेत भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही. अशा स्थितीत वाढीव भाडे देऊन माल बाजारात नेणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे झाले आहे. वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर शेतीमाल शेतातच सोडून देण्याची किंवा स्थानिक पातळीवर कवडीमोलाने विकण्याची वेळ आली आहे.
डिझेल दरवाढीचा आणि मालवाहतूक भाडेवाढीचा थेट फटका जुन्नरच्या व्यापारी जगताला बसला आहे. मुंबई, गुजरात आणि इतर भागांतून येणारा किराणा माल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि प्रामुख्याने सिमेंट-स्टील यांसारख्या बांधकाम साहित्याची वाहतूक महागली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंची मूळ किंमत वाढवावी लागत आहे. वस्तू महागल्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली असून, खरेदीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक मंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाऊक व्यापाऱ्यांपासून ते अगदी गल्लीबोळातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच या दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.
वाहतूक व्यवसाय आधीच व्हेंटिलेटरवर
दुसरीकडे, मालवाहतूक करणाऱ्या वाहन धारकांची बाजूही तितकीच बिकट झाली आहे. “आम्हाला हौस म्हणून भाडेवाढ करावी लागत नाही, तर ही आमची जगण्याची धडपड आहे,” अशी प्रतिक्रिया वाहन मालकांनी दिली आहे. डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे जुन्या दराने गाड्या चालवणे आता अशक्य झाले आहे. गाड्यांचे बँक हप्ते (EMI), वार्षिक इन्शुरन्स, आरटीओ टॅक्स, टायरचे वाढलेले भाव आणि महामार्गांवरील टोल टॅक्स यामुळे वाहतूक व्यवसाय आधीच व्हेंटिलेटरवर आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात आला असून, भाडेवाढ न केल्यास गाड्या उभ्या करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य
जुन्नर तालुक्यातील या परिस्थितीवरून स्पष्ट होते की, डिझेलच्या दरवाढीने केवळ वाहतूकदारच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि व्यापारीही होरपळून निघाला आहे. इंधनाचा हा भडका वेळीच शांत न झाल्यास, येत्या काळात भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील आणि सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कर कपात करून डिझेलचे दर आटोक्यात आणावेत, अशी आर्त हाक जुन्नर तालुक्यातून दिली जात आहे.






