सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास युवाशक्तीने आज जमिनीवर आणलेला आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी व शिक्षण पद्धतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात रणशिंग फुंकले होते. मागील अधिवेशनात त्यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती पण अहंकारी मोदी सरकारने त्यावर चर्चा केली नाही, त्यानंतर छात्रों की गुंज हे अभियान सुरु केले, राहुल गांधी, काँग्रेस पक्ष, युवक काँग्रेस, NSUI या संघटनांनी देशभर आवाज उठवला. तरुणाई रस्त्यावर उतरली, रस्त्यापासून संसदेपर्यंत शिक्षणातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यात आल. मागील दीड दोन महिन्यापासून देशातील तरुण मोदी सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात पेटून उठला होता. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या वल्गणा केल्या पण त्याची पूर्तता केली नाही, सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, स्पर्धा परिक्षातून काही यश मिळेल यासाठी विद्यार्थी चार चार वर्षे प्रयत्न करतात पण त्यातही घोटाळे होत असतील तर विद्यार्थ्यांनी कुठे जायचे, हा मोठा प्रश्न आहे, असेही सावंत म्हणाले.
मोदी सरकारच्या काळात ५० टक्के तरुण बेरोजगार झाले आहेत. सरकारने आधीच ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. मागील १० वर्षात १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण सरकारने काहीच केले नाही. तरुणाई रस्त्यावर उतरली असता त्यांच्यावर अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली, पॅलेट गनने हल्ला करण्यात आला. आज शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा झालेला आहे पण विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या, त्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांचाही राजीनामा झाला पाहिजे, असेही सचिन सावंत म्हणाले. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर टिळक भवन येथे पेढे वाटण्यात आले व ढोल ताशे वाजवून आनंद साजरा करण्यात आला.






