सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ : मावळच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मावळ तालुक्याला पुन्हा एकदा ‘लाल दिवा’ मिळणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, पक्षांतर्गत बदल आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शेळके यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वपूर्ण फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यात शेळके यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अण्णा बनसोडे यांच्याकडे आहे. मात्र पक्षाला प्रभावी आणि जनाधार असलेल्या नेतृत्वाला संधी द्यायची असल्याने नवीन जबाबदाऱ्यांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मावळच्या राजकीय इतिहासात काँग्रेसचा एकेकाळी मोठा प्रभाव होता. त्यानंतर भाजपने बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात मजबूत संघटन उभे केले. भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मावळला राज्याच्या राजकारणात विशेष ओळख मिळाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये आपले अस्तित्व वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आणि त्या निर्णयाने मावळच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली. पहिल्याच निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांमध्ये पक्षाची मजबूत सत्ता उभी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे.
मावळच्या राजकीय इतिहासात यापूर्वी मदन बाफना आणि बाळा भेगडे या नेत्यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. आता सुनील शेळके यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा रंगू लागल्याने तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी “मावळला पुन्हा लाल दिवा मिळणार का?” हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे






