पुण्यातील उत्पादन शुल्क कार्यालयाला टाळे लावण्याचा युवक कॉंग्रेसचा प्रयत्न!
पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे अखेर पोलिसांच्या मध्यस्थीत युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक श्री. अतुल कानडे यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई व जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन सादर केले.
यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. शहरात सर्रास सुरू असणाऱ्या अवैध व भेसळयुक्त दारूविक्रीकडे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच, पोर्शे कार अपघाताचा संदर्भ देत क्लबमधील बेकायदेशीर व्यवहारांना पोलिसांपेक्षा उत्पादन शुल्क विभागच जास्त जबाबदार असल्याचे सांगत, यावर कारवाई न झाल्यास या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी युवक काँग्रेस लवकरच ‘स्टिंग ऑपरेशन’ करेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, पुणे शहर प्रभारी गणेश उबाळे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, प्रदेश सरचिटणीस भूषण रानभरे, महेश म्हेत्रे, प्रदेश सचिव विश्वजीत जाधव, अभिषेक अवचर, अथर्व सोनार, निखिल मलके, विकास सुपनार, विवेक कडू यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका करताना काँग्रेसने आपल्या ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत सांगितले की, “या भीषण दुर्घटनेची थेट आणि नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांवरच आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकीय डावपेच आखण्यात आणि आपली खुर्ची टिकवून ठेवण्यातच मग्न आहेत; परिणामी, गृहविभागावरील त्यांची पकड पूर्णपणे ढिली झाली आहे. ज्या व्यक्तीने एकेकाळी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याबाबत पोकळ दावे केले होते, त्याच व्यक्तीचा प्रशासनावर आता ना कोणताही वचक राहिला आहे, ना दरारा. काँग्रेसने अशी भूमिका मांडली की, या निष्पाप लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण, जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही.”
अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी, अदिती तटकरेंसह उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना






