संग्रहित फोटो
सासवड : पुरंदर विमानतळ प्रकल्प भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. अनेक शेतकरी स्वतःहून संमतीपत्रे देत असून त्यापोटी मिळणारा मोबदला घेणे आणि पैसे लगेचच कुठे गुंतवणूक करता येतील या प्रक्रियेत व्यस्त आहेत. त्याचवेळी स्थानिक अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील फळपिके, इतर झाडे, शेत तळे यांच्या नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकरी आता नोंदी करून घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनीची संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून त्यामध्ये असलेली वेगवेगळी झाडे, फळ पिके, विहीर, शेत तळे, बोअर, पत्राशेड, गोठे, यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना क्रमांक देवून त्याप्रमाणे त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिलेली आहे.
आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जमिनीची संमती घेवून त्यांना त्यांच्या क्षेत्राचे त्यातील विविध बांधकामे, आणि इतर गोष्टींचे नुकसान पोटी एकरकमी परतावा देण्यात येत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व माहिती घेवून आणि खात्री झाल्यानंतर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. तसेच यासाठी जिल्हाधिकार्यांनी सुरुवातीलाच १० जूनपर्यंत स्वच्छेने परवानगी देणाऱ्यांना प्राधान्य राहील अशा आशयाची नोटीस प्रसिद्ध केल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनीची संमती दिली आहे.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना भेटून कागदपत्रांची आणि मिळणाऱ्या परताव्याची माहिती घेताना शेतातील नोंदी अपूर्ण असल्याचे लक्षात आले. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा होणार आहे. त्यामुळे पूर्वी केलेल्या नोंदी आणि अधिकाऱ्यांकडे असलेल्या कागदपत्रांवरील नोंदीत मोठ्या प्रमाणात तफावत येत आहेत. मागील तीन ते चार वर्षात शेतकऱ्यांनी हजारो झाडे आंब्याची, सीताफळ, जांभूळ त्याचप्रमाणे इतर फळबागा लावल्या आहेत. मात्र नोंदी करताना त्यामध्ये विषमता दिसून येत आहेत. काही झाडांना लाखो रुपये तर त्याच बागेतील काही झाडांना मात्र किरकोळ स्वरुपात पैसे मिळत आहे असे दिसून आले आहे. शेत तळी, बांधावरील झाडे,. शेतातील झाडे यांच्या नोंदीत विषमता दिसून येत आहे. त्यामुळे असे शेतकरी आता संबंधित अधिकाऱ्यांकडे पुन्हा नव्याने नोंदी करण्यासाठी पाठपुरावा करताना आढळून येत आहेत.
हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पूर्वीच्या नोंदी आणि आताच्या नोंदी यामध्ये तफावत आढळून येत असेल त्यांनी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे तशा पद्धतीचा मागणी अर्ज केल्यास त्यांना पुढील तारीख न देता त्याच दिवशी त्यांच्या शेतावर सर्व विभागाचे अधिकारी येतील आणि लगेचच मोजणी करून त्यांचे समाधान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी, महसूल, भूसंपादन, एमआयडीसी, ग्रामपंचायत असे सर्व विभागांचे अधिकारी शेतावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्याप्रमाणे मोबदला देण्यात येईल. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी शासन पूर्ण काळजी घेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.
यापूर्वी जमिनीची मोजणी करताना काही शेतकरी उपस्थित नव्हते तसेच काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यांची मोजणी झालेली नव्हती. असे शेतकरी आता शेतातील नोंदी करून घ्यावेत यासाठी अर्ज करीत असून, शेतकऱ्यांच्या अर्जानुसार आमचा सर्व विभाग त्यांच्या शेतात पाहणी करून त्याप्रमाणे नोंदी घेत आहेत. काही शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा काही तक्रारी असतील तर भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. त्याप्रमाणे नोंदी घेण्यात येत आहेत. -श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी.






