सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुरंदर तालुक्यासह संपूर्ण राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची नैसर्गिक महाविकास आघाडी आहे. तर शिवसेना भाजपची महायुती आहे. सत्तेच्या सारीपाटात शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. सद्यस्थितीत पुरंदर तालुक्यात विजय शिवतारे यांची शिवसेना भक्कम असून, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाममात्र आहे. त्याचप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार गटही अंधारात चाचपडत आहेत. मात्र दोन्ही एकत्र आल्यास त्यांची मते नेहमीच निर्णायक ठरणारी आहेत.
राज्यात शिवसेना भाजपची महायुती आहे, मात्र पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आणि भाजपचे संजय जगताप यांच्यात विळ्याभोपळ्याचे वैर आहे, हे जगजाहीर आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांना आपापले अस्तित्व टिकवायचे असल्याने राजकीय मतभेद विसरून तात्पुरती युती आघाडी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पुरंदरला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास शिवसेना आणि भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे. कारण राष्ट्रवादी बरोबर नसल्याचा संजय जगताप यांना विधानसभा निवडणुकीत फटका बसलेला आहे.
पुरंदरमध्ये संजय जगताप यांचे सहकाराचे मोठे जाळे आहे. कात्रज दुध संघ, जिल्हा बँक, नीरा बाजार समिती, विविध विकास कामगार सोसायटी, सोमेश्वर साखर कारखाना यावरती राष्ट्रवादीच्या मदतीने अनेक वर्षापासून भक्कम जाळे निर्माण केले आहे. विजय शिवतारे यांना मात्र सहकार क्षेत्र आतापर्यंत दूरच राहिलेले आहे. तसेच आगामी काळातील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा संजय जगताप यांची मदत घ्यावी लागणार आहे. परंतु विजय शिवतारे आणि संजय जगताप यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती होत असेल तर अजित पवारांना मोठा शह बसणार आहे. मात्र संजय जगताप यांना सहकारातील विकास सोसायट्या वगळता इतर निवडणुकीसाठी शिवतारे यांचा फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही.
तालुक्यात भाजपची ताकद असली तरी प्रत्येक नेत्याने आपले वेगळे अस्तित्व ठेवले आहे. गराडे गणमध्ये गंगाराम जगदाळे यांची ताकद आहे, तर दिवे गणात बाबाराजे जाधवराव यांची ताकद आहे. नीरा कोळविहीरे मध्ये माजी आमदार अशोक टेकवडे यांची ताकद आहे. बहुतेक गटगणात भाजपच्या नेत्यांनी आपापल्या नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे संबंधित नेते नातेवाईकांच्या प्रचारात अडकून पडल्यानंतर इतर ठिकाणी प्रचार कधी करणार ? परिणामी संजय जगताप यांच्यावर प्रचाराची जबाबदारी येणार असल्याची शक्यता आहे. कॉंग्रेसमध्ये असताना जगताप स्वतःच्या विचारांचे उमेदवार देत होते, मात्र आता त्यांना भाजपच्या इतर नेत्यांना विचारात घ्यावे लागणार आहे. परिणामी संजय जगताप यांचे अनेक खंदे समर्थक उमेदवारीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
शिवतारे- जगताप यांची युती झाल्यास दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये दोन्ही पक्षांना दोन गट आणि प्रत्येकी चार चार गण दिले तरी शिवतारेंकडे दोन गट आणि चार गण येतील. मात्र भाजपमधील इतर नेते उमेदवारीसाठी आग्रही असून, संजय जगताप यांच्याकडे त्यांच्या विचारांचे उमेदवार देताना चाळण लावावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जावूनही नुकसान करून घेण्यापेक्षा शिवसेनच्या विरोधात लढल्यास स्वतंत्र अस्तित्व राहील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा मार्ग मोकळा राहील.
विजय शिवतारे यांचासोबत युती झाल्यास शिवतारे यांना नीरा बाजार समिती, जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, दुध संघ यामध्ये प्रवेश करण्यास अधिक सोयीस्कर ठरणार आहे. यामध्ये शिवतारे यांचा फायदाच होणार असून, संजय जगताप यांना मात्र नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे विजय शिवतारे यांना सहकारासह सर्वच ठिकाणी रोखून धरण्यासाठी राष्ट्रवादीशी जवळीक सोयीस्कर ठरणार आहे. मात्र पक्षाच्या आदेशानुसार युती झाल्यास आगामी काळात संजय जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार हे मात्र नक्की.






