कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो आहेत - डॉ. विश्वजीत कदम
पुणे : कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे योद्धेच समाजाचे खरे हिरो आहेत. त्यांना आपण प्रेरणा देण्यापेक्षा त्यांच्या धैर्य आणि सकारात्मकतेतून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचा संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे मत भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्सर सर्व्हायव्हर मीट या विशेष कार्यक्रमात केले.
यावेळी आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या, कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्यावर रुग्णाबरोबरच कुटुंबाचीही कसोटी असते. औषधोपचाराबरोबर मानसिक आधारही महत्वाचा असतो. कॅन्सर तज्ञ डॉ. अमन चौधरी यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील संकल्पना सांगितली. एका कॅन्सरमुक्त रुग्णाला पाहून अशा प्रकारे उपचार घेत असलेल्या अनेकांना प्रेरणा मिळते हा मुख्य उद्देश कार्यक्रम आयोजनामागील असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कॅन्सरमुक्त योद्धे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन केले. एका शालेय विद्यार्थ्याने, दोन वर्षांच्या बालकाच्या वडिलांनी आणि उपचारानंतर पुन्हा नोकरीवर रुजू झालेल्या रुग्णाच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात रेडिओ सिटी ९१.१ एफएम चे आरजे केदार यांनी विविध खेळ, संगीत आणि मनोरंजनात्मक उपक्रमांद्वारे उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्य्रक्रम आयोजनात कॅन्सर तज्ञ डॉ. अमन चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. २०० हून अधिक कॅन्सरमुक्त योद्धे, त्यांचे कुटुंबीय, डॉक्टरर्स यावेळी उपस्थित होते. डॉ. शिवकुमार अय्यर यांनी आभार प्रदर्शन केले.






