Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
रस्त्यांवर धावपळ उडाली, काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. मात्र प्रत्येकाच्या मनात या पावसाबद्दल समाधान आणि आनंदाचीच भावना होती. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. दिवसभर ऊन आणि ढंग यांचा सुरू असलेला लपंडाव, दमट वातावरण आणि वाढलेली उष्णता यामुळे जनजीवन अस्वस्थ झाले होते. अशा परिस्थितीत रविवारी बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण करत सर्वांनाच सुखद दिलासा दिला. (फोटो सौजन्य – Pinterest)
पावसाचे पहिले थेंब पडताच बालगोपाळांनीही आनंदाने जल्लोष केला. अनेक ठिकाणी मुले पावसात भिजत, खेळत आणि सरींचा मनमुराद आनंद लुटताना दिसून आली. अनेकांसाठी हा पाऊस केवळ ऋतूचा बदल नव्हता, तर तो उन्हाच्या काहिलीवर मिळालेला निसर्गाचा दिलासादायक स्पर्श ठरला. शेतकरी वर्गासाठी हा पाऊस विशेष समाधानकारक ठरला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने पेरण्यांबाबत संभ्रमाचे वातावरण होते. कृषी विभागाने पेरण्या पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असला, तरी मृग नक्षत्रावर विश्वास ठेवत काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पेरणी केली होती. त्यामुळे त्यांची चिंता वाढली होती.






