संग्रहित फोटो
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, यासाठी माजी खासदार पाटील यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले होते. पंचनाम्यांसाठी गावोगावी जाऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या या लढ्याला यश मिळाले असून, संबंधित विभागाने सांगली जिल्ह्यासाठी १४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
बँक खात्यात पैसे जमा, पण वसुलीची भीती
मदतीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला बँकांनी शेतकऱ्यांचे हे मदतीचे पैसे त्यांना न देता, त्यांच्या इतर थकीत बाकीसाठी जमा करून घ्यायला सुरुवात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी वाघ यांना ही बाब निर्देशास आणून देत, मदतीच्या पैशांचे ‘कटिंग’ न करण्याची मागणी केली.
सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही. त्यांना फक्त मदत दिली आहे. त्यात ही जर बँकांनी अशा पद्धतीने पैशाची वसुली चालू केली तर शेतकऱ्यांची परिस्थिती अजून वाईट होईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे आलेले मदतीचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत, यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. -संजय पाटील माजी खासदार






