सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती/अमोल तोरणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम पाहिलेले सुनीलकुमार मुसळे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दादांच्या आठवणींनी भरलेली ही पोस्ट वाचताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत असून, त्यांच्या सहवासातील आठवणींचा हळवा पट त्यातून उलगडतो. मुसळे यांनी गेली अनेक वर्षांपासून अजितदादांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. अपघातावेळी ते स्वतः बारामती विमानतळावर अजितदांची वाट पाहत होते.
अजितदादांच्या निधनाला २८ फेब्रुवारी रोजी १ महिना पूर्ण झाला आहे, आजही बारामतीकर त्याच दुःखात आहेत. गेल्या अनेक दिवसानंतर मुसळे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट मोठी चर्चेत आली आहे. मुसळे यांनी आपल्या पोस्टची सुरुवात “हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे” या ओळींनी केली आहे. त्यांनी सांगितले की, एक महिना उलटून गेला असला तरी अजितदादांच्या अचानक झालेल्या निधनाचा आघात अजूनही मनावर कायम आहे. त्या घटनेच्या वेळी ते स्वतः बारामती विमानतळावर दादांना घेण्यासाठी गेले होते. विमान लँड होईल असे वाटत असतानाच ते पुन्हा वर गेले आणि काही वेळाने आले असता घडलेली दुर्घटना आयुष्यभर न विसरणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
दादांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य समजून गेल्या महिनाभर सतत धावपळ सुरू असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. दादांचे नाव चिरंतन राहावे आणि त्यांनी सुरू केलेले काम पुढे जावे, यासाठी काम करत राहणेच हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुसळे यांनी एका भावनिक प्रसंगाचाही उल्लेख केला आहे. काही दिवसांच्या धावपळीनंतर पत्नीच्या आग्रहामुळे ते घरी थोडावेळ निवांत बसले. त्यावेळी किशोर कुमार यांच्या आवाजातील “पल पल दिल के पास” हे गाणे ऐकू आले आणि दादांच्या आठवणींनी डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटल्याचे त्यांनी लिहिले आहे. अजितदादांना किशोरकुमार यांची गाणी खूप आवडत असत. गाडीत प्रवास करताना संग्रामने दिलेला पेनड्राइव्ह लावायला ते सांगत आणि गाण्यांवर चुटकी वाजवत स्वतःही गुणगुणत असत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
“माझे अस्तित्व, माझी ओळख आणि माझे आयुष्य याचे कारण अजितदादा होते,” असे भावनिक शब्दांत त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या सहवासामुळे महाराष्ट्रभर असंख्य स्नेहसंबंध जुळले, असेही त्यांनी लिहिले. दादांच्या आठवणींनी मन हेलावले असले तरी त्यांच्या कुटुंबासोबत ठामपणे पुढे चालत राहण्याचा निर्धारही मुसळे यांनी व्यक्त केला आहे. कवि ग्रेस यांच्या “हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे” या ओळी उद्धृत करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अजितदादा-जनतेतील महत्त्वाचा दुवा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्ते, नागरिक आणि भेटीगाठीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असायची. विविध कामांसाठी आलेल्या अनेकांना या गर्दीत दादांना थेट भेटणे कधी कधी शक्य होत नसे. अशा वेळी दादा आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वासाचा महत्त्वाचा दुवा म्हणून सुनीलकुमार मुसळे यांचे नाव पुढे येत असे. बारामतीसह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि शक्य तितक्या लवकर दादांपर्यंत त्यांच्या अडचणी पोहोचवणे ही भूमिका त्यांनी सातत्याने निभावली. सध्या मुसळे हे विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.






