अमरावती : लोकसभा निवडणूक जवळ आल्याने अनेक राजकीय हालचाली घडत आहे. अमरावतीमधील नेत्या नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. 2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं? असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.
अमरावतीच्या सभेमध्ये सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीमध्ये नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र डागले. अंधारे म्हणाल्या, “नवनीत आक्कावर हल्ला करणारा आमचा शिवसैनिक पण मंचावर आहे. जर मला जात चोरता आली असती तर मला कदाचित अमरावती निवडणूक लढवता आली असती. एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते आणि पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल का लागत नाही? निकाल काय लागणार हे माहीत आहे का? गणेश विसर्जन कसं करतात हे तरी कळते का?” असा सवालही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केला.
या संविधान लोकांना बदलायचं आहे
“उदयनराजे यांना चार दिवस वेटिंगवर ठेवले. एकाच रात्री नवनीत राणाची उमेदवारी दिली आणि लगेच एकाच दिवशी अमित शहा भेटतात. देवा भाऊ नवनीत राणाचं वजन तुमच्यापेक्षा जास्त होत आहे का? ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांना सगळं माहीत आहे की काय घडलं. जितका मोठा घोटाळा तितक पद मोठं ही मोदींची गॅरंटी आहे. संविधान धोक्यात आलं आहे. या संविधान लोकांना बदलायचं आहे. ज्या बाईने हनुमान चालीसा वर वादंग केलं त्यांना अजूनही हनुमान चालीसा म्हणता येत नाहीये,” असेही अंधारे यांनी नमूद केलं.
पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला
“भाजपच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल. इथले भाजपचे लोक ही नवनीत राणाला मतदान करणार नाहीत. कापसाला भाव फक्त 11 हजार रुपये दर हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांना मिळाला. आज 6 हजार रुपये पेक्षा कमी मिळत आहे. ज्या ज्या लोकांच्या घरी धाडी टाकल्या त्याच्या पाच ते सहा दिवसात त्या लोकांनी पार्टी फंड दिलेला आहे. नवनीत राणाला मतदान करतांना तुम्ही शरद पवार यांच्याकडे पाहून दिले. आता असं वाटत आहे की, पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला. नवनीत राणा यांना मी खुल आवाहन करते की, अमरावतीच्या गरीब लेकरांना दत्तक घेऊन त्यांना फुकटात शिक्षण देऊन दाखवा. अमरावतीच्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही भावनिक होऊ नका,” असे आवाहन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.