मराठी सक्तीवर राजकारण सुरू; पण मीरा-भाईंदरातील रिक्षाचालकांनी दाखवली भाषेप्रती सकारात्मक भूमिका
मीरा-भाईंदर शहरात परिवहन विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा कार्यशाळांमध्ये सुमारे 4,500 रिक्षाचालकांनी नावनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये मोठ्या संख्येने परराज्यातील रिक्षाचालकांचाही सहभाग आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक भाषेत संवाद साधता यावा, प्रवाशांशी अधिक सुसंवाद निर्माण व्हावा आणि स्थानिक संस्कृतीशी जवळीक वाढावी, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम स्वीकारला आहे.
Mumbai : मिरा-भाईंदर महापालिकेत वेतनाचा घोळ! औषध फवारणी विभागातील १५० कामगारांचे मानधन थकीत
कार्यशाळांमध्ये रिक्षाचालकांना दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे मराठी शब्द, वाक्यरचना, प्रवाशांशी संवाद साधण्याची पद्धत, मार्गदर्शन करताना वापरायची भाषा याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामुळे चालकांचा आत्मविश्वास वाढल्याचेही दिसून येत आहे.
रिक्षाचालकांच्या मते, मुंबई महानगर प्रदेशात विविध राज्यांतील नागरिक वास्तव्यास असले तरी महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी समजणे आणि बोलता येणे ही गरज आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे ही कार्यशाळा केवळ नियमपूर्तीसाठी नसून त्यांच्या दैनंदिन व्यवसायासाठीही उपयुक्त ठरत आहे.
मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून काही राजकीय पक्षांनी सरकारवर टीका केली, तर काहींनी हा निर्णय मराठी अस्मितेचा विजय असल्याचे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या राजकीय वादांपेक्षा प्रत्यक्षात हजारो रिक्षाचालकांनी स्वेच्छेने मराठी शिकण्याचा घेतलेला पुढाकार अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे चित्र मीरा-भाईंदरमध्ये दिसून आले.
१५ ऑगस्टची अंतिम मुदत जवळ येत असताना आणखी रिक्षाचालक या कार्यशाळेत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिवहन विभागाकडूनही मराठी भाषा प्रशिक्षणाचा हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.
राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असले, तरी मीरा-भाईंदरमध्ये 4,500 रिक्षाचालकांनी मराठी शिकण्यासाठी पुढाकार घेतला, हीच या उपक्रमाची खरी यशोगाथा असल्याचे नवराष्ट्र डिजिटलच्या ग्राउंड रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. या सकारात्मक बदलामुळे भविष्यात प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.






