श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कामगारांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे वेतन अद्याप न मिळालं नसल्याची भूमिका ठामपणे मांडली. या दोन महिन्यांत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचं कंत्राटदारांनी ठेकेदारांना सांगितलं. मात्र ठेकेदार वेतन देण्यास टाळाटाळ करत असल्याचं कंत्राटदारांनी सांगितलं. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान कामगारांनी तिरडी उभारून ठेकेदार व पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे आंदोलन सुरू असतानाही अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांचे दफन व दहन करण्याचे कार्य कामगारांनी माणुसकीच्या भावनेतून सुरूच ठेवले. स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देतानाही सामाजिक जबाबदारीचे भान राखल्यामुळे या कामगारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या एकूण 16 स्मशानभूमी आणि दफनभूमी असून येथे सेवा देण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर 58 कामगारांची नियुक्ती केली आहे. या कामांचा ठेका दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आला आहे. त्यापैकी एका कंपनीकडून वेतन वेळेवर दिले जात असले तरी दुसऱ्या कंपनीकडून सातत्याने विलंब होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, वेतन थकविण्याबरोबरच ठेकेदाराकडून मृतदेह हाताळण्यासाठी आवश्यक सुरक्षा साहित्य, दफन-दहनासाठी लागणारे साहित्य तसेच स्वच्छतेसाठी लागणारी साधनेही उपलब्ध करून दिली जात नाहीत. परिणामी अनेक वेळा कामगारांना स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी करून काम करावे लागत आहे.
पालिकेने ठेकेदारासोबतच्या करारामध्ये कामगारांचे वेतन वेळेत देणे बंधनकारक केले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत पालिका प्रशासनावरही कामगारांनी निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. ठेकेदारावर कारवाई न झाल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत सायंकाळी महापालिकेचे अधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी कामगार प्रतिनिधींशी संपर्क साधून शुक्रवारी थकीत वेतनाबाबत चर्चेसाठी बैठक बोलावली. आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी कामगार संघटनेचे मिरा-भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे, पदाधिकारी कमलेश घरत आणि मनोहर हणवते यांनी केले.
यावेळी मंगेश मोरे म्हणाले की, “पालिकेने करारात स्पष्ट सूचना देऊनही ठेकेदार कामगारांचे वेतन वेळेवर देत नाही. आवश्यक साहित्य पुरविले जात नाही. एप्रिल महिना सुरू होऊनही फेब्रुवारी-मार्चचे वेतन प्रलंबित आहे. शुक्रवारी होणाऱ्या चर्चेत ठोस तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.” या घटनेमुळे शहरातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या स्मशानभूमीतील कामगारांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.






