राज ठाकरे यांना मोठा दिलासा ! कल्याण रेल्वे स्टेशन मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
मोठी बातमी समोर येत असून अठरा वर्षांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राज ठाकरे यांच्यासह सहा जणांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुरुवारी (२१ मे) ठाणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला असून राज ठाकरेंसह सहा जणांना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.
२००८ साली रेल्वे भरतीनिमित्त परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या या याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते. २००८ साली नव्यानेच स्थापन झालेल्या राज ठाकरे यांच्या मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलने करण्यात येत होती. अश्यातच २००८ साली निघालेल्या रेल्वे भरती प्रक्रियेत उत्तर भारतीय तरुणांना रेल्वेकडून जास्त प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत होता. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती.
या मारहाणीच्या घटनेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन कार्यकर्त्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने राज ठाकरे यांच्यासह सहा कार्यकर्त्यांवर कल्याण दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु होती त्यानंतर हे प्रकरण ठाणे जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले.
शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?
या प्रकरणात राज ठाकरे यांची बाजू वकील शैलेश वाडेकर, शुभम कानडे आणि सयाजी शिंदे यांनी लढवली तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण या युक्तिवाद करत होत्या. ६ मे रोजी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांनी हे प्रकरण बनावट असल्याचे सांगून आपल्यावरील आरोप फेटाळले होते. गुरुवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायाधीश ए. व्ही. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी आणि बचावपक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे.
अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा






