Wardha News: आष्टीत महापुराचा तडाखा; शेकडो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
तालुक्यातील वडाळा, साहूर, बोरगाव, माणिकवाडा, तारासावंगा, अंतोरा, खंबीत, बेलोरा, भारसवाडा, खडकी, परसोडा, सिरसोली, चिस्तूर, भीषनूर, आनंदवाडी, राणवाडी, तळेगाव, बंबर्डा, बोरखेडी, थार, किन्ही, मोई, धाडी, पोरगव्हाण, पंचाळा, पिलापूर, लहान आर्वी, जैतापूर, लिंगापूर, जोलवाडी, देलवाडी आणि अंबिकापूर परिसरातील नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केल्याने शेकडो शेतांमधील नव्याने पेरलेली खरीप पिके वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये अद्यापही पाणी साचून आहे.
२७ व २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी सावरत नाही तोच १, २, ३ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या संततधार पावसाने उरली सुरली आशाही हिरावून घेतली. सोयाबीन, कापूस, तूरसह विविध खरीप पिके पूर्णपणे खरडून गेली असून अनेक ठिकाणी सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. बियाणे आणि खतांसाठी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून किंवा उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा पेरणीसाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महापुरामुळे कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अनेक गावांमध्ये महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच विशेष अनुदान मंजूर करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
नैसर्गिक आपत्तीने आधीच होरपळलेल्या अन्नदात्याच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा आर्थिक विवंचनेत भर पडून शेतकरी आणखी अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतकार्याला गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.






