Representative image (Credit - social media)
वर्धा, ब्युरो : विश्रांती घेतलेल्या पावसाने वर्धा जिल्ह्यात पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने गुरुवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हा अंदाज खरा ठरत गुरुवारी दिवसभर आणि सायंकाळपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, शुक्रवारसाठी हवामान विभागाने जिल्ह्यास यलो अलर्ट जारी केला आहे.
वर्धा शहरातील ३० घरात पावसाचे पाणी गुरुवारी वर्धा शहरासह परिसरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. रामनगर, कृष्णनगर, पोद्दार बगीचा, जैन मंदिर परिसर, महादेवपुरा, स्टेशनफैल आदी भागांतील नाल्या तुंबल्याने पावसाचे पाणी साचून सुमारे ३० घरात शिरले. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. पाणी साचलेल्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाल्यांतील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले.
४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा …
जिल्ह्यातून १२ प्रमुख नद्या वाहत असून त्यांच्या काठावर सुमारे २१३ गावे वसलेली आहेत. यापैकी २७ गावे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्हा व तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. संभाव्य पूरस्थिती आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच वाढीच्या अवस्थेतील सोयाबीन, कापूस, तूर आदी खरीप पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार
देवळी तालुक्यातील शिरपूर, रत्नापूर आणि भिडी या गावांमध्ये नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पाणी काही घरांमध्ये शिरले. या तीन गावांतील सुमारे ५० घरांना पावसाचा फटका बसला असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.






