‘महागाई करणारे सरकार हाय हाय’; काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात हल्लाबोल, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मेलोडी चॉकलेट वाटप
उंब्रज: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेवर पडणारा आर्थिक भार, वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार (२२ मे 2026) सकाळी १० वाजता उंब्रज येथील पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय!”, “महागाई करणारे सरकार हाय हाय!” अशा घोषणांनी वातावरण चांगलेच तापले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना सत्वशिला चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर आणि आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा हा देशहितासाठी नसून उद्योगपती अदानी यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसून येते. अदानी यांना नॉर्वेमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. तिथे जाऊन चॉकलेट वाटण्यात आणि प्रसिद्धी मिळविण्यात सरकार व्यस्त आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “या सरकारची धोरणे सर्वसामान्य जनतेसाठी नसून केवळ काही उद्योगपतींच्या हितासाठी आहेत. परदेशात फिरून देशाची प्रतिष्ठा वाढत नाही. लोकाभिमुख निर्णय, सक्षम अर्थव्यवस्था आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी उपाय योजना केल्या तरच जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाते. केवळ स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवून घेतल्याने कोणी विश्वगुरू होत नाही.”
या आंदोलनात अजित पाटील चिखलीकर, वसंत पाटील, नामदेव पाटील, सुरेश पाटील, संग्राम पवार, अमित जाधव, सत्यवान चव्हाण, प्रताप देशमुख आणि शंकर खोत यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईवर तातडीने नियंत्रण आणावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील काँग्रेसचा आक्रमक सूर पुन्हा एकदा रस्त्यावर उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.






