राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या (फोटो- सोशल मीडिया)
जिल्हा परिषद अन् पंचायत समितीची निवडणूक पुढे ढकलली
राज्यात दुखवटा असल्याने घेतला निर्णय
7 तारखेला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी
ZP Election 2026: राज्यात निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा केली होती. 5 तारखेला मतदान आणि 7 तारखेला निकाल जाहीर होणार होते. मात्र आता या निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
काल विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता नवीन निर्णयानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका 7 आणि 9 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.






