(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘हास्यजत्रा’मधून कोकणी व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते प्रभाकर मोरे आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या लोकप्रिय बालनाट्यात ते पहिल्यांदाच काम करत असून पुजाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी प्रमाण मराठीत संवाद बोलण्याचे आव्हानही यशस्वीपणे पेलले आहे.हे गाजलेले बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असून प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज आहे. या नाटकाचे दिग्दर्शन प्रशांत गिरकर यांनी केले असून त्यांनी त्याला आधुनिक सादरीकरणाची जोड दिली आहे.या नाटकाचे पुढील प्रयोग १६ एप्रिल रोजी ठाणे येथील काशीनाथ घाणेकर येथे, १७ एप्रिलला बोरिवली आणि दादर येथे होणार आहेत.मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये याचे १० यशस्वी प्रयोग आधीच झाले आहेत. आता मुलांच्या परीक्षेनंतर सुट्ट्यांमध्ये हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात सादर होणार असून १ ते ३ मे दरम्यान कोकण दौऱ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आपला अनुभव शेअर केला. ते म्हणाले, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.”‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य केवळ लहान मुलांसाठी नसून मोठ्यांसाठीही विचार करायला लावणारं आहे. संस्कृती आणि परंपरेची सुंदर सांगड घालणाऱ्या या नाटकातून आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारं हे नाटक प्रत्येकाने आवर्जून पाहावं, असं आवाहनही प्रभाकर मोरे यांनी यावेळी केलं.
‘कर्टेन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटिल थिएटर’ अर्थात‘बालरंगभूमी’या संस्थेकडून नीळकंठ नांदुरकर लिखित हे विनोदी नाटक नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकात काम करत त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या अभिनयामुळे हे नाटक त्या काळात प्रचंड गाजलं होतं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर या नाटकाला नव्या रूपात सादर करत आहेत.
या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे ‘धम्माल पुजारी’च्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत सागर पवार, नीता दोंदे, निखिल केंजळे, प्रकाश अय्याळ, अजित सावरे, प्रेम औटि, आशिक चव्हाण, विरराज राजपूत, उन्नती शिंदे, बालकलाकार अबीर जोशी, गोजिरी जगदाळे, कियारा पाटील, श्रीजा पोटे, आयुष टेंबे, ध्रुव खानविलकर, सिद्धेश बरीदे, ओवी भुजबळ, मृगा जोशी नाटाकाची रंगत वाढवणार आहेत.
या नाटकाविषयी बोलताना दिग्दर्शक प्रशांत गिरकर सांगतात, आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे नाटक. हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, संस्कार आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडतं आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या मूल्यांची जाणीव करून देत, कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे नाटक करतं. विशेष म्हणजे, हे फक्त बालनाट्य नाहीतर मोठ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी बालकांसोबत बालक होवून पहावे असे नाटक आहे. पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट करण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.
नाटकाचे नेपथ्य महेश साळगावकर तर संगीताची जबाबदारी आनंद ओक यांनी सांभाळली आहे. रंगभूषा स्वप्नील चिमणे, प्रकाशयोजना केदार भोंडवे यांची आहे. वेशभूषा काजल अटेलियर यांची आहे. निर्मिती व्यवस्था नरेंद्र आंगणे यांनी सांभाळली आहे.






