(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता आर. माधवन यांनी आपल्या कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या वळणाविषयी प्रामाणिकपणे भाष्य करताना दिसला आहे. अभिनय क्षेत्रात यश, लोकप्रियता आणि सतत काम असूनही ते आतून असमाधानी होते, म्हणूनच त्यांनी जाणूनबुजून चार वर्षांचा ब्रेक घेतल्याचा खुलासा आता केला आहे. २०११ साली माधवन यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ते ज्या भूमिका साकारत होते, त्या त्यांना सर्जनशील समाधान देत नव्हत्या. अखेर २०१६ मध्ये ‘साला खडूस’ या चित्रपटातून अभिनेत्याने दमदार पुनरागमन केले. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यांच्या रोमँटिक इमेजपासून दूर जात अधिक गंभीर, वास्तववादी भूमिकांचा प्रवास सुरू झाला. माधवन या टप्प्याला त्यांच्या करिअरचा “फेज टू” म्हणतात.
रोहित शेट्टीच्या पुढील चित्रपटासाठी सतर्कता, ‘गोलमाल 5’च्या सेटवर कडक बंदोबस्त तैनात
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत माधवन यांनी या ब्रेकमागील अनुभव सांगितला. परदेशात चित्रीकरण करत असताना त्यांना एक प्रसंग आयुष्यभर लक्षात राहिला. स्वित्झर्लंडमध्ये एका तमिळ गाण्याच्या शूटिंगदरम्यान ते रंगीबेरंगी कपड्यांत रस्त्याच्या मधोमध उभे होते. त्यावेळी जवळच बसलेला एक स्विस शेतकरी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत होता. त्या क्षणी माधवन यांना अचानक जाणवले की ते त्यांच्या कामातून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण स्वतःच्या कलात्मक समाधानाकडे दुर्लक्ष होत आहे.
या घटनेनंतर सुरुवातीला दुखावले गेलेले माधवन हळूहळू आत्मपरीक्षणाकडे वळले. त्यांना कळून चुकले की ते ज्या भूमिका करत होते, त्यामध्ये स्वतःचे खरे योगदान फारच कमी होते. या काळात त्यांची पत्नी सरिता बिर्जे यांनी त्यांना पूर्णपणे समजून घेतले आणि आधार दिला. चार वर्षांच्या विश्रांतीदरम्यान माधवन यांनी चित्रपट आणि जाहिरातींपासून स्वतःला दूर ठेवले. त्यांनी दाढी वाढवली, साधे जीवन जगले आणि चेन्नईसह संपूर्ण भारतात प्रवास केला. या प्रवासात त्यांनी रिक्षाचालक, सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला आणि देशातील वास्तव, लोकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. माधवन यांच्या मते, हा अनुभवच आज त्यांच्या अभिनयाचा खरा पाया आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी आर. माधवन यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या अपेक्षेपलीकडचा असल्याची भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. कामाच्या आघाडीवर, माधवन अलीकडे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या हिट चित्रपटात झळकले होते. आता ते ‘धुरंधर २’ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी ते अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत ‘दे दे प्यार दे २’ मध्येही दिसले होते.






