(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक शहरांमध्ये आणि उपनगरांमध्ये शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही हा मराठी चित्रपट आपली मजबूत स्थान टिकवून आहे.
सध्या विविध ठिकाणी झालेल्या थिएटर व्हिजिट्सदरम्यान कलाकार आणि टीमला मिळालेला प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरत आहे. अनेक प्रेक्षक फक्त शीर्षक पाहून हलका-फुलका, मजेशीर चित्रपट पाहाण्याची अपेक्षा घेऊन गेले होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर हास्याबरोबरच नकळत डोळ्यांत पाणी आणणारे भावनिक क्षण त्यांच्या हृदयाला स्पर्श प्रत्येक डोळ्यांत पाणी आणत आहेत. शो संपल्यानंतर प्रेक्षकांकडून येणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया इतर प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. चित्रपटातील सासू-सूनच्या नात्यातील प्रसंग, संवाद प्रेक्षकांना हसवतानाच भावनिकही करत आहेत. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटत असून निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करत आहेत. तसेच प्रेक्षक या चित्रपटासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचे आभार मानत आहेत.
चित्रपटाबद्दलची आणखी विशेष गोष्ट अशी की, काही महिलांनी या चित्रपटाची तिकिटे हळदीकुंकूवाचे वाण म्हणून दिली आहेत. चित्रपटाबरोबरच चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्यांवर सोशल मीडियावर रील्स शेअर केले जात आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचत असून यामुळे त्यांची नाती अजून घट्ट होत आहेत.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “आज हिंदी मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेत मराठी चित्रपट चित्रपटगृहात आपली जागा टिकवत आहेत, याचा खूप अभिमान वाटतो. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले आहे, ते संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी आहे. घराघरांत दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्यांची गंमत, भावना आणि ताकद या चित्रपटात आहे, म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाशी जोडला जात आहे.”
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.






