पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले
पाचोड : पैठण तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ८१ ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. अधिकाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करून त्याची ताकद वाढण्यासाठी तालुक्यातील दिग्गज नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पडद्याआड कामाला लागले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंचपदाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.
तालुक्यातील लक्षवेधी असलेले पाचोड, विहामांडवा, बिडकीन, नवगाव, या सर्कलमधील ८१ ग्रामपंचायतीचा कार्यकाल दहा फेब्रुवारीला संपला. या ग्रामपंचायतींमध्ये आता प्रशासकराज आले आहे. विहामांडवा, कोळीबोडखा, थेरगाव, वडजी, रांजणगाव दांडगा, दादेगाव हजारे, दावरवाडी, नांदर, केकत जळगाव आदी ग्रामपंचायतमध्ये आतापासूनच गट तयार करण्यात येत आहेत. कोणत्या वॉर्डात कोणता उमेदवार उभा करायचा, सरपंचपदासाठी कोण याचीदेखील चाचपणी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हॉटेल, धाबे, शेतात चर्चा होत असल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा : राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?
प्रत्येक गावात वेगवेगळे पॅनल तयार करण्याचे गणित आखले जाऊ लागले आहे. ग्रामपंचायत उभ्या राहणाऱ्या उमेदवारावर कर थकबाकी आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.
पडद्याआडून हलवली जाताहेत सूत्रे
गावपातळीवरील निवडणुका या अस्तित्व सिध्द करुन दाखवणाऱ्या असतात. त्यामुळे विविध पक्षाचे नेतेमंडळी समोर न येता पडद्याआड प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय सूत्रे हलवत आहेत. पक्षापेक्षा पॅनलच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जातात. परिणामी, गावात निष्कलंक असलेल्या कार्यकर्त्याला आपल्या पॅनलमध्ये ओढण्यासाठी गावपुढाऱ्यांची चढाओढ सुरू आहे.
दिवाळीनंतर बिगूल वाजण्याची शक्यता
गावातील सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. आता प्रभागरचनाही होत आहे. मे महिन्यापर्यंत ही प्रक्रिया होईल. यानंतर जून, जुलै किंवा दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हासोबतच गावखेड्याचे राजकीय वातावरण आतापासूनच तापत असल्याचे चित्र दिसत आहे.
हेदेखील वाचा : शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’






