वैर ते मैत्री? आमदार बाबर-पडळकर समीकरणाने खानापूर-आटपाडी हादरले
सांगली / प्रवीण शिंदे : खानापूर-आटपाडी मतदारसंघात वर्षानुवर्षे टोकाच्या संघर्षाने ओळखले जाणारे आमदार सुहास बाबर (शिवसेना-शिंदे गट) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील समीकरण अचानक बदलल्याचे संकेत मिळत असून, जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर हा ‘राजकीय यू-टर्न’ चर्चेचा विषय ठरला आहे.
कालपर्यंत राजकीय मंचावरून एकमेकांवर जहरी टीका, कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष, गावागावांत ध्रुवीकरण-अशी परिस्थिती असताना, कोल्हापुरात भाजपच्या सदस्यांच्या बैठकीत बाबर गटाचे सदस्य आणि कुटुंबीय उपस्थित दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे या बैठकीत पडळकर कुटुंबीयांसोबत बाबर समर्थकांची उपस्थिती हा राजकीय ‘शॉक’ मानला जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत बाबर गटाने चांगली कामगिरी करत अनेक जागा जिंकल्या. त्यामुळे सत्ता स्थापनेत बाबर यांची भूमिका निर्णायक मानली जात होती. मात्र, पडळकर यांच्याशी मतभेद असल्याने शिवसेना भाजप सोबत जाण्याची शक्यता नव्हती. शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता होती, दोन सदस्य तर आघाडीसोबत उघड उघड गेले ; परंतु अशा वेळी त्यांच्या गटातील सदस्य भाजपच्या छावणीत दिसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. “कालपर्यंत ज्यांच्यावर दगडफेक झाली, त्यांच्यासोबत आजच कसे?” असा थेट सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या शक्यता चर्चेत आहेत. बाबर यांच्यावर राजकीय दबाव आला का? की जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या ऑफरमुळे त्यांनी भूमिका बदलली? सत्तेसाठी ‘वैर विसरणे’ हा राजकारणाचा भाग असला तरी या घडामोडींचा वेग पाहता, काहीतरी मोठे समीकरण पडद्यामागे शिजत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या नव्या समीकरणामागे राज्यस्तरीय बड्या नेतृत्वाची भूमिका असल्याचीही कुजबुज सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दोन्ही नेत्यांतील मतभेदावर पडदा टाकत ‘एकत्र या’चा संदेश दिला का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या तोंडावर उभ्या राहिलेल्या या घडामोडींमुळे सांगलीतील सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार बनला असून, बाबर-पडळकर समीकरणाचा अंतिम परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युती मजबूत की अंतर्गत बंड? मतदानावेळीच स्पष्ट होणार चित्र
जिल्हा परिषद सत्तासंघर्षात शिवसेना (शिंदे गट), भाजप, रयत क्रांती आणि जनसुराज्य अशी युती एकत्र आली असली तरी अंतर्गत मतभेद डोके वर काढताना दिसत आहेत. शिवसेना (शिंदे गट)चे दोन सदस्य सध्या महाविकास आघाडीसोबत असल्याची चर्चा असून, ते पक्षाच्या अधिकृत भूमिकेला साथ देणार की उघड बंडखोरी करत आघाडीच्या बाजूने मतदान करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्ष आमचाच होईल; चंद्रकांतदादांचा विश्वास
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही मोठा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तील काही सदस्य आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. “अध्यक्ष आमचाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने सत्तासमीकरण आणखी चुरशीचे झाले आहे. उद्याच्या अध्यक्ष निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदानावेळीच कोण कुठे उभे आहे, याचे खरे चित्र स्पष्ट होणार असून, बंडखोरी की पक्षनिष्ठा-यावरच सत्ता कोणाची ठरणार हे अवलंबून आहे.
हेदेखील वाचा : Khandala News : १५ वर्षांचा वनवास संपला! खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; कार्यकर्त्यांचा जल्लोष






