मनसे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर भेट झाली (फोटो - सोशल मीडिया)
Raj Thackeray CM Fadnavis Meet : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. मुंबईसह अनेक महापालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणूका होणार आहे. मुंबई पालिकेवर वचर्स्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये ठाकरे गट आणि भाजप तसेच मनसेसाठी मुंबई मिळवणे हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानकपणे भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही दोन्ही नेत्यांची दुसरी भेट आहे. यापूर्वी दोन्ही नेते अशाच पद्धतीने अचानक ट्रायडेंट हॉटेलवर भेटले होते. यावेळी देखील जोरदार राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता राज ठाकरे हे वर्षावर दाखल होत भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाले आहे. अनेक दशकांच्या भांडणानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्येहिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय फडणवीसांच्या सरकारने केला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित आले. त्याचबरोबर राज ठाकरे अनेक दोन दशकांनंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने मातोश्रीवर देखील दाखल झाले होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आणि मराठी माणसांच्या आग्रहासाठी राज-उद्धव एकत्र येतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बेस्टच्या निकालाचा धक्का
मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूकीमध्ये उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्रित लढले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही निवडणूक चाचणी मानली जात होती. मात्र यामध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव पत्करावा लागला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते, परंतु त्यांच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. हा निकाल ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा दोन्ही पक्ष आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याची तयारी करत आहेत. यामुळे आता राज ठाकरे यांनी आपली राजकीय चाल बदलली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.