खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut Live : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक विषयांवर जोरदार वाद निर्माण झाला आहे. यामध्ये एक भारत-पाकिस्तान सामन्याचा मुद्दा आहे. यावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध पेटले आहे. महायुतीच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. याला संजय राऊत यांनी जोरदार विरोध करत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. संपूर्ण भाजप हे अर्धवट ज्ञानी आहेत. काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो. त्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही. भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असाल, महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपले कुंकू गमावले, त्यांच्या कुंकवाची त्यांना कदर असेल, तर ते अशी विधाने करणार नाहीत,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भाजपने मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचे व्हिडीओ पाहिले पाहिजेत. एकवचनी या पुस्तकात बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली. दिलीप वेंगसरकर अचानक जावेद मियादला घेऊन मातोश्रीवर आले. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करु नका, पुन्हा सुरु करा, ही विनंती करण्यासाठी ते बाळासाहेबांकडे आले होते. तेव्हा बाळासाहेबांनी दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही, असे सांगितले आहे. तुमच्या नरेंद्र मोदींसारखे शेपूट घालणारे नाहीत,” अशा शब्दांत खासदार राऊत यांनी घणाघात केला आहे.
पुढे पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरवरुन संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या वेळी रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे मोदी म्हणाले. चहा प्या आणि निघून जा, असे बाळासाहेबांनी तोंडावर मियादला सांगितलं. जावेद मियाद सोड ना.. आताच बोला,” असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी टीका करताना म्हणाले की, “तुम्ही बेल्जियममध्ये आरशाची फॅक्टरी काढली. तिथे तुमच्या आरशाची फॅक्टरी आहे ना, त्यात पाहा, तुम्ही त्या विवस्त्र दिसाल. तुम्ही स्वत:ला विवस्त्र पाहाल. पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का इतकंच हो की नाही हे सांगा. भाजपने पाकड्यांसमोर पैशांसाठी शेपूट घातलं आहे. तुम्ही कोणाची तरफदारी करताय. काल काही लाडक्या बहिणींना राखी बांधून घेतल्यात. ज्या २६ महिलांचे कुंकू पुसले त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत. भाजप म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे. जावेद मियादादचा विषय किती वर्षे काढताय. पंडीत नेहरु काढतात. त्यापेक्षा स्वत:च बोला. तुम्ही स्वत: उघडे नागडे पडले आहात,” अशा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.