NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर अतुल लोंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
NCP Split Rumors: राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सध्या अंतर्गत कलह टोकाला पोहोचल्याची चिन्हे दिसत पक्षामध्ये काहीही सुरळीत सुरू नसल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या चर्चेला उधाण आले असतानाच, आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल?” असा थेट सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील २४ आमदार भाजपमध्ये जातील, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर बोलताना अतुल लोंढे यांनी या दाव्याला दुजोरा दिला, मात्र आकडा आणखी मोठा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. अतुल लोंढे म्हणाले की, “रोहित पवार यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. खरं तर रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतील अशा ४० लोकांची नावे आहेत, जे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, असे म्हटले होते. सत्तेत गेल्यावर हे लोक फुटणार असून राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडणार आहे.”
पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील नाराजीच्या चर्चांमुळे आधीच संशयाचे वातावरण आहे. त्यातच लोंढेंच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील अत्यंत कमी उपस्थितीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल लोंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण देत ठाकरेंची पाठराखण केली. “उद्धव ठाकरेंची उपस्थिती सभागृहात कमी होती हे खरे असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील उपस्थिती किती वेळा असते? मोदींची उपस्थिती अतिशय कमी आहे, ते फक्त टिंगलटवाळी करण्यासाठी संसदेत येतात. त्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती नक्कीच जास्त आहे,” असा टोला लोंढे यांनी लगावला.






