ठाकरे गटाच्या स्थितीस राऊत जबाबदार : आशिष जयस्वाल
नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. आता हा गट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आजच्या स्थितीसाठी खासदार संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
एका व्यक्तीवरील अतिविश्वासामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ज्या स्थितीत आणून ठेवली आहे, त्याबाबत आता फारसे बोलण्यासारखे उरलेले नाही. ठाकरे गटाच्या खासदारांच्या दिल्ली दौऱ्यासह पक्षात घडणाऱ्या अलीकडील घटनांचा विचार करून वारंवार बंडखोरी का होत आहे, यावर उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला आशिष जयस्वाल यांनी विमानतळावर मीडियाशी बोलताना दिला.
दरम्यान, ठाकरे गटात सातत्याने असंतोष आणि गटबाजी वाढताना दिसत असल्याचा दावा करत जयस्वाल म्हणाले, पक्षात वेगवेगळे गट निर्माण होत आहेत. त्यामुळे नेतृत्वाने नेमकी चूक कुठे होत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
शिंदे गटात दररोज प्रवेश
शिंदे गटात दररोज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याचा दावा करताना भविष्यात खासदार आणि आमदारही पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारला असता जयस्वाल यांनी, काय घडते ते लवकरच समजेल, असे सूचक उत्तर दिले.
सावध राहण्याचा सल्ला
संजय राऊत यांच्यावर आता कुणाचाही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. सर्व काही गमावल्यानंतर शहाणपण येण्यात काही अर्थ नसतो, असा टोला जयस्वाल यांनी लगावला. तसेच राऊत यांच्या विरोधात त्यांच्या गटात कुणीही उघडपणे बोलू शकत नसल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांना यापूर्वीच त्यांच्याबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला होता, असेही त्यांनी सांगितले.






