रामदास कदमांच्या टीकेला सुनील तटकरेंचे सडेतोड उत्तर
रायगड: शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या टीकेला सुनील तटकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं असून, रामदास कदम यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी, मनोज शिंदे, समीर शेडगे आणि इतरांनी याआधीच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मी आजवर या विषयावर कधीही काही बोललो नव्हतो. परंतु, त्यांनी केलेल्या वक्तव्यात थेट माझ्या वडिलांचा उल्लेख केला आहे.”
तटकरे यांनी पुढे सांगितले की, “१९८४ साली, म्हणजेच जवळपास ४४ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यावेळी माझे वय २९ वर्षे होते. रामदास कदम यांनी केवळ माझ्यावरच नाही, तर माझ्या दिवंगत वडिलांचाही एकेरी भाषेत उल्लेख केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
रामदास कदम यांच्यावर थेट शब्दांत हल्ला चढवताना तटकरे यांनी एका मराठी म्हणीचा वापर केला. ते म्हणाले, “आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला आणि त्यातच विंचू दंश झाला” अशीच काहीशी अवस्था आज रामदास कदम यांची झाली आहे.
पुढे बोलताना त्यांनी पिसाळलेल्या श्वानाचा (कुत्र्याचा) संदर्भ देत म्हटले की, “मला कोणीतरी सांगितले की, पिसाळलेला श्वान चावल्यानंतर माणसावर त्याचे जे परिणाम होतात, तसेच काहीसे ते बोलू लागतात. रामदास कदम यांचे बोलणेही तसेच वाटत आहे.”
‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
तटकरे यांनी या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घालणार असल्याचे सांगितले. “मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन करून विनंती करणार आहे की, ठाण्यामध्ये जे रुग्णालय आहे, तिथे रामदास कदम यांच्यासाठी एखादी खाट (Cot) राखीव करता आली तर त्यांनी नक्की करावी. यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जे रोज धिंडवडे काढले जात आहेत, ते कुठेत्री थांबतील,” असा टोला तटकरे यांनी लगावला.
या संपूर्ण प्रकरणावरून महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






