Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात थेट लढत झाली होती. प्रचारादरम्यान तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली येथे घेतलेल्या सभेत वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेटाळून लावत तो मॉर्फ (संपादित) करण्यात आल्याचा आरोप केला होता. व्हिडिओतील मजकूर निवडक पद्धतीने एडिट करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला होता. दुसरीकडे, शिवसेनेकडून हा व्हिडिओ अस्सल असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्याची भूमिकाही पक्षाने घेतली होती. त्यानंतर वसंत डावखरे यांनी न्यायालयात धाव घेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात खटला दाखल केला.
या प्रकरणातील सुनावणीदरम्यान आता कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावत 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या सुनावणीत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार आणि त्यांच्या बाजूने कोणते युक्तिवाद केले जाणार, याकडे राजकीय आणि कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या खटल्याची पुढील कायदेशीर दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. डावखरे कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्या भूमिकेवर आणि न्यायालयातील पुढील सुनावणीवर या प्रकरणाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार असल्याचे कायदेविषयक जाणकारांचे मत आहे. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर या बहुचर्चित प्रकरणातील पुढील घडामोडी आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
‘दिपकेंची जात आडवी आली का?’ तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात






