Vidharbha Congress Politics: विधान परिषद निवडणुकीपूर्वी पूर्व विदर्भात राजकीय भूकंप! काँग्रेस आणि अजित पवार गटाला मोठे धक्के
Vidharbha Congress Politics: राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पूर्व विदर्भातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेत काही ठिकाणी पक्षांतरे, तर काही ठिकाणी नगरसेवकांच्या गूढ अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
अकोला जिल्ह्यात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बार्शी-टाकळी नगरपंचायतीतील १० नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे चार, अजित पवार गटाचे दोन आणि चार अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. काँग्रेसच्या ११ पैकी ९ नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ ७ वरून १६ वर पोहोचले असून स्पष्ट बहुमत निर्माण झाले आहे.
दुसरीकडे काँग्रेस नगरसेवकांनी नगराध्यक्ष किशोर गरोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यापूर्वी काँग्रेस आणि शिंदेसेना यांनी एकत्र येत नगरपालिकेतील सत्तासमीकरणे तयार केली होती. मात्र आता काँग्रेसमधील मोठा गट ठाकरे गटाकडे वळल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
गोंदिया-भंडारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवरी तालुक्यातील काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्यासह दोन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित सदस्य भाजपच्या नगरसेवकांसोबत सहलीला गेल्याची चर्चा असून, या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर विभागातील हिंगणा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सहा नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अतूल लोंढे तर महायुतीचे उमेदवार राजीव पोतदार मैदानात आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात असताना या नगरसेवकांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषद निवडणुका जवळ येत असताना राज्यातील विविध भागांत पक्षांतर, नगरसेवकांच्या हालचाली आणि राजकीय गटबाजी वाढल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी महायुतीला लाभ होताना दिसत असला, तरी मेहकरसारख्या भागात महाविकास आघाडीने आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतरची राजकीय समीकरणे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






