फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याला मागील अनेक वर्षापासून भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने यावर उघडपणे देखील बोलले होते. आयपीएल 2025 मध्ये त्याने कोलकता नाईट राइडर्सचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याचबरोबर तो रणजी ट्राॅफीमध्ये देखील मुंबईचे कर्णधारपद सांभाळत होता. त्याने मागील या वर्षामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आता त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, त्याने त्याच्या सोशल मिडियावर ही बातमी शेअर केली आहे.
रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि चॅम्पियनशिप जिंकणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. नवीन स्थानिक हंगाम येत असल्याने, मला वाटते की नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे आणि म्हणूनच मी कर्णधारपदाची भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
Captaining and winning championships with the Mumbai team has been an absolute honour.
With a new domestic season ahead, I believe it’s the right time to groom a new leader, and hence I’ve decided not to continue in the captaincy role.
I remain fully committed to giving my best…
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 21, 2025
अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ हंगामात रणजी ट्रॉफी जिंकून ७ वर्षांचा ट्रॉफी दुष्काळ संपवला. अजिंक्य रहाणेने आतापर्यंत मुंबईसाठी ७६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये रहाणेने फलंदाजी करताना ५२ च्या सरासरीने ५९३२ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून १९ शतकेही निघाली आहेत. वसीम जाफरनंतर रहाणे हा मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.