( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Rahul Deshpande: मराठी संगीतविश्वातील आघाडीचे गायक, अभिनेते आणि संगीतकार राहुल देशपांडे सध्या ‘ओ रोमियो’ आणि शाहिद कपूरसोबतच्या कामामुळे चर्चेत आहेत. अभिनय क्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली असली, तरी संगीत हेच आपलं पहिलं प्रेम आणि खरी ओळख असल्याचं राहुल यांनी स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड, राष्ट्रीय पुरस्कार, ‘अभंगवारी’चा ११ वर्षांचा प्रवास आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं.
‘बॉलिवूडच्या मागे धावणार नाही’
बॉलिवूडमध्ये पूर्णवेळ करिअर करण्याबाबत विचारलं असता राहुल देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “पूर्णवेळ? कधीच नाही. अभिनय हे माझं प्राधान्य नाही आणि कदाचित कधीच असणार नाही. एखादी चांगली भूमिका किंवा आवडत्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन. मात्र, बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी कधीही धडपड करणार नाही. माझ्यासाठी संगीत नेहमीच प्रथम क्रमांकावर असेल.”
राष्ट्रीय पुरस्कारानंतरही बदललो नाही
‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? या प्रश्नावर राहुल म्हणाले, “राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून मी बदललो आहे, असं मला वाटत नाही. लोकांना खूश करण्यासाठी किंवा वेगळं दिसण्यासाठी मी कधीही निर्णय घेत नाही. कलाकार म्हणून स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करता येईल, अशाच माध्यमाची मी निवड करतो.” त्यांच्या मते, संगीत, नाटक, संगीतप्रधान चित्रपट किंवा अभिनय ही सर्व माध्यमं केवळ अभिव्यक्तीची वेगवेगळी रूपं आहेत.
‘मी सर्वप्रथम शास्त्रीय गायक’
अभिनय आणि संगीत यापैकी एकाची निवड करायची झाली तर कोणता पर्याय निवडाल, असा प्रश्न विचारल्यावर राहुल यांनी कोणताही विलंब न लावता उत्तर दिलं. “मी सर्वप्रथम शास्त्रीय गायक आहे. तीच माझी खरी ओळख आहे. अभिनय आवडतो, पण फक्त लोकांना मला पडद्यावर पाहायचं आहे म्हणून मी अभिनय करणार नाही. ज्या कामात कलेशी प्रामाणिक राहता येईल, तेच काम स्वीकारेन.”
‘अभंगवारी’ला देशभरातून मिळालं प्रेम
‘अभंगवारी’ या उपक्रमाच्या ११ वर्षांच्या प्रवासाविषयी बोलताना राहुल म्हणाले, “या उपक्रमाला इतकं प्रेम मिळेल, याची कधी कल्पनाही केली नव्हती. आज महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू अशा शहरांमधूनही लोक आवर्जून कार्यक्रम ऐकण्यासाठी येतात. भक्तीची भाषा थेट हृदयाला स्पर्श करते, याचा हा अनुभव आहे.”
‘वन अभंग, वन स्टोरी’ या संकल्पनेविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, प्रत्येक संताचा संदेश समानता, निस्वार्थ प्रेम आणि माणुसकीचा आहे. अभंगातील शब्दांचा अर्थ समजला की त्याचा प्रभाव अधिक खोलवर जाणवतो.
ट्रोलिंग आणि सोशल मीडियाबद्दल स्पष्ट भूमिका
रिमिक्स कल्चर, सोशल मीडिया आणि ट्रोलिंगबद्दल विचारलं असता राहुल देशपांडे म्हणाले, “यापैकी कोणत्याही गोष्टीची मला पर्वा नाही. कोण ट्रोल करतंय किंवा कोण काय बोलतंय, याकडे लक्ष दिलं तर माझ्या कलेवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. मी स्वतःला फक्त एक गायक मानतो. जोपर्यंत मी माझ्या कलेशी आणि मनाशी प्रामाणिक आहे, तोपर्यंत बाकी सर्व माझ्यासाठी केवळ गोंगाट आहे.”
राहुल देशपांडेंच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, “संगीत हीच माझी खरी ओळख” हे त्यांचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.






