अंतिम सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये रंगणार चुरस (Photo Credit- X)
भारतीय संघाने मुंबईत पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, न्यूझीलंडने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने फायनलचा सामना अत्यंत रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.
जसप्रीत बुमराह विरुद्ध किवी सलामीवीर: जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अचूक यॉर्कर आणि स्विंगचा सामना करणे फिन ॲलन आणि टिम सायफर्ट यांच्यासाठी कठीण परीक्षा असेल. सुरुवातीच्या षटकांत बुमराहला मिळणारे यश भारतासाठी निर्णायक ठरू शकते.
मॅट हेन्रीचा धोका: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री नेहमीच आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याचा सामना संजू सॅमसन आणि युवा अभिषेक शर्मा यांना करावा लागेल. सॅमसन सध्या फॉर्ममध्ये असला तरी अभिषेकला मोठी खेळी करून स्वतःला सिद्ध करावे लागेल.
स्पिनर्सची भूमिका: अहमदाबादची खेळपट्टी संथ आणि मोठी असल्याने मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र हे फिरकीपटू महत्त्वाचे ठरतील. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यासाठी सँटनरचे आव्हान असेल, तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांची आक्रमक फलंदाजी किवी फिरकीपटूंवर दबाव निर्माण करू शकते.






