लढत सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांत संग्रामने योग्य संधी साधत प्रतिस्पर्ध्याच्या पायावर हल्ला केला. त्यांनी आबिद अली यांच्या घोट्याला घट्ट पकडून त्यांना बचावाची कोणतीही संधी दिली नाही. यानंतर त्याने प्रतिस्पर्ध्याला केजच्या मध्यभागी खेचत ‘चोक सबमिशन’चा प्रभावी डाव लावला. या पकडीतून सुटका अशक्य झाल्याने पाकिस्तानी खेळाडूला अखेर पराभव स्वीकारत ‘टॅप आऊट’ करावे लागले. प्रशिक्षकांच्या मते, अर्जेंटिनामधील मागील MMA सामन्यातही संग्राम यांनी असाच लेग-अटॅकचा डाव यशस्वीपणे वापरला होता.
संग्राम यांचे प्रशिक्षक भूपेश कुमार यांनी सांगितले की, ‘मोहम्मद आबिद अली यांच्याकडे दमदार पंच, उंची आणि लांब रीचचा मोठा फायदा होता. सामन्याच्या सुरुवातीलाच संग्राम यांच्या डोळ्याजवळ एक जोरदार पंच बसला. तरीही त्यांनी संयम राखला आणि अनावश्यक पंचांच्या देवाणघेवाणीमध्ये अडकण्याऐवजी आपल्या जागतिक दर्जाच्या ग्रॅपलिंग कौशल्यावर भर दिला.’
चॅम्पियन बनल्यानंतर, संग्राम सिंगने आपला विजय भारताच्या १.४ अब्ज नागरिकांना समर्पित केला. तो म्हणाला की, ‘हा विजय माझ्या देशाच्या, भारताच्या १.४ अब्ज नागरिकांना समर्पित आहे. जेव्हा जेव्हा मी रिंग किंवा केजमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मी संपूर्ण राष्ट्राच्या आशा आणि तिरंग्याचा सन्मान सोबत घेऊन जातो. हे विजेतेपद भारतमातेला समर्पित आहे.’
मलेशियातील एरिनामध्ये संग्राम सिंह यांच्या विजयाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघाले. त्यांच्या विजयानंतर प्रेक्षकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून टाकले. विजय मिळवल्यानंतर संग्रामने हा ऐतिहासिक किताब देशातील १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. प्रत्येक वेळी रिंग किंवा केजमध्ये उतरताना भारताचा तिरंगा जागतिक मंचावर अभिमानाने फडकवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.’
संग्राम सिंगने यापूर्वी आंतरराष्ट्रीय एमएमए स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याने पाकिस्तानचा अली रझा नासिर, ट्युनिशियाचा हकीम त्राबेल्सी आणि फ्रान्सचा फ्लोरियन कुडियर यांसारख्या लढवय्यांना पराभूत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला गौरव मिळवून दिला आहे.
कुस्तीच्या मैदानावर यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर संग्राम सिंगने MMA मध्ये प्रवेश केला आणि हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला. MMA मधील हा त्यांचा सलग चौथा विजय असून तो अद्याप अपराजित आहे. विशेष म्हणजे स्ट्राइक आशिया चॅम्पियन’ बनणे हा त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि पाकिस्तानच्या खेळाडूवर मिळवलेला हा त्यांचा दुसरा विजय आहे. त्यामुळे कॉम्बॅट स्पोर्ट्समध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.






