क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही (Photo Credit- X)
पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत निवेदन जारी करून ही घोषणा केली. निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली आहे. तथापि, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नाही.”
#ICCT20WORLDCUP | Pakistan will not play the match against India on February 15th, tweets Government of Pakistan pic.twitter.com/4dUN9Xi1EE — ANI (@ANI) February 1, 2026
पाकिस्तानच्या या निर्णयामुळे टीम इंडियाला मोठा लॉटरी लागली आहे. मैदानावर न उतरता आणि चेंडू न फेकताही भारतीय संघाला या सामन्याचे दोन गुण बहाल केले जातील. पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारताला विजयी घोषित केले जाईल.
या संपूर्ण वादाच्या मुळाशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) नाराजी आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर केकेआरने मुस्तफिजूरला संघातून बाहेर काढल्यामुळे बांगलादेश बोर्ड संतापले होते. बांगलादेशने त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळली. यामुळे बांगलादेशने विश्वचषकावर बहिष्कार टाकला. या वादात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) बांगलादेशच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनीही आता भारताविरुद्ध न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे.
२०२६ च्या विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ‘ग्रुप ए’ मध्ये आहेत. या गटात त्यांच्यासोबत नेदरलँड्स, नामिबिया आणि यूएसए या संघांचा समावेश आहे. ७ फेब्रुवारीपासून भारताची मोहीम सुरू होईल, तर १५ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्धचा बहुप्रतिक्षित सामना नियोजित होता. मात्र, आता हा ‘महामुकाबला’ केवळ कागदावरच मर्यादित राहिला आहे.






