भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना (फोटो- ians)
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाने रचला नवा रेकॉर्ड
पाकिस्तानविरुद्ध स्मृतीने केली ६८ रन्सची खेळी
१०० प्रभावशाली खेळाडूंमध्ये सामील झाले स्मृतीचे नाव
Smriti Mandhana: सध्या आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला आहे. भारताच्या विजयात स्मृती मंधानाचे मोठे योगदान राहिले आहे. संघ अडचणीत सापडला असताना स्मृतीने ६८ रन्सची शानदार खेळी केली. उद्या भारतीय संघ नेदरलँड्स विरुद्ध सामना खेळणार आहे. त्याआधी स्मृती आणि भारतीय क्रिकेटसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधानाने जागतिक स्तरावर भारताच्या आणि स्वतःच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. प्रसिद्ध टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील १०० प्रभावशाली खेळाडूंमध्ये स्मृती मंधानाला स्थान मिळाले आहे. या संपूर्ण यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.
‘टाइम’ने जाहीर केलेल्या २०२६ च्या यादीमध्ये क्रीडापटू, प्रशिक्षक आणि गुंतवणूकदार यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी आपल्या क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचे आणि मोठे प्रभावशाली काम केले आहे, त्यांचे नाव या यादीत पाहायला मिळत आहे.या यादीमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, बास्केटबॉल लेजेंड लेब्रोन जेम्स यांचा देखील समावेश आहे. यावरून स्मृती मंधानाने मिळवलेले हे यश किती मोठे आहे हे लक्षात येते.
स्मृती मंधाना सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे उपकर्णधार पद भूषवत आहे. सध्याच्या घडीला स्मृती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती आरसीबीचे नेतृत्व करत आहे. तिने उमटवलेला ठसा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिचे सातत्यपूर्ण प्रदर्शन यामुळेच तिची निवड ‘टाईम’ने या यादीत केली आहे.
स्मृती-हरमनप्रीत जोडीचा ऐतिहासिक कीर्तिमान
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या १८ धावांत दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीसाठी आली आणि तिने स्मृती मानधनासोबत डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची शानदार भागीदारी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. टी-२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारताची ही आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वीचा विक्रम शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या होत्या.






