युनूस सरकार संकटात! सत्ता संघर्ष तीव्र, थेट बांगलादेशच्या स्थैर्यावर घाला? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत देशाचे लष्करप्रमुख जनरल वकार उझ झमान यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राजकीय अस्थिरतेला या परिस्थितीला जबाबदार धरत देशाचे सार्वभौमत्व धोक्यात असल्याचा इशारा दिला आहे. पुढील १८ महिन्यांत सार्वत्रिक निवडणुकांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील परिस्थिती गंभीर
एका लष्करी कार्यक्रमात बोलताना जनरल झमान यांनी सांगितले की, देश अराजकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि याला राजकीय गोंधळ जबाबदार आहे. “आपण जी अराजकता पाहत आहोत ती आपणच घडवली आहे,” असे सांगत त्यांनी सुरक्षा यंत्रणांवरील परिणामांविषयीही चिंता व्यक्त केली. पोलीस खात्यातील कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या खटल्यांमुळे किंवा त्यांच्या तुरुंगवासामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, सामान्य प्रशासन कार्यक्षमतेने काम करू शकत नाही आणि लष्करावर अधिक जबाबदारी येते. यामुळे देशातील हिंसाचार आणि सामाजिक तणाव वाढत असून, या सर्वांचा थेट परिणाम बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! चीनने केली ‘LIVE फायर’ ड्रिलची घोषणा; तैवानने केले सैन्य तैनात
सर्वसामान्य नागरिकांना शांततेचे आवाहन
देशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जनरल वकार उझ झमान यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. “तुम्ही जर आपसातच भांडत राहिलात, तर देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात येईल,” असे सांगून त्यांनी लोकांना समंजसपणे परिस्थिती हाताळण्याचा सल्ला दिला. त्यांनी राजकीय पक्षांवरही कठोर शब्दांत टीका केली. “सर्व पक्ष एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे गुन्हेगारी घटनांना संधी मिळत आहे. गुन्हेगारांना वाटते की ते काहीही करून सुटू शकतात. यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे,” असे ते म्हणाले. शेख हसीना सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. हसीना सरकार पडल्यावर आलेल्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारदरम्यानही हिंसाचार सुरुच राहिल्याने लोकांमध्ये अस्वस्थता आहे.
हिंसाचार आणि मोर्च्यांचे सत्र सुरूच
बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरात हिंसक आंदोलनांनी कहर केला आहे. २०२३ च्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या तोडफोड आणि निषेधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्तीचे नुकसान झाले आहे. विशेषतः ऑगस्टमध्ये शेख हसीना सरकार पडल्यापासून ही परिस्थिती अधिकच चिघळली आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. या वाढत्या अस्थिरतेमुळे सुरक्षा दलांनी फेब्रुवारीमध्ये ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ राबवले, ज्यामध्ये तीन आठवड्यांत आठ हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CIA आणि ड्रग कार्टेल यांच्यातील ‘तसे’ संबंध; गुप्त दस्तऐवजांमधून धक्कादायक खुलासे
बांगलादेशच्या भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल
या पार्श्वभूमीवर, बांगलादेशला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी लष्करप्रमुखांनी १८ महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका घेण्यावर भर दिला आहे. ते म्हणाले, “जर योग्य वेळी योग्य पावले उचलली गेली नाहीत, तर खूप उशीर होईल.” तज्ज्ञांच्या मते, बांगलादेशच्या सध्याच्या परिस्थितीचा परिणाम संपूर्ण दक्षिण आशियावर होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप सोडून देशाच्या सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी एकत्र येण्याची गरज आहे.