India's big decision...! Pakistan face water crisis? (photo - social media)
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मोठा निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने घेतलेल्या निर्णयासंदर्भात अहवाल समोर आलाय. त्यात जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखून ठेवले तर पाकिस्तानची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पाकिस्तानला प्रचंड भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, पाकिस्तानच्या शेजारील देशांची पाणी साठवायची क्षमता कमी असून त्याचा परिणाम कृषी, वीजनिर्मिती या क्षेत्रावर होऊ शकतो.
पाकिस्तानची शेती ८० टक्के सिंधू नदीवर अवलंबून असल्याने सिंधू जल करार स्थगित करणं पाकिस्तानसाठी हा धक्का मोठा समजला जात आहे. सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या प्रवाहात भारताच्या निर्णयामुळे मोठी घट झाली असून, नद्यांमधील पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे. इकोलॉजिकल थ्रेट रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीला असलेले धरण केवळ ३० दिवस सिंधू नदीचा प्रवाह रोखू शकते. त्यामुळे भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची गोची झाली दिसून येत आहे.
पाकिस्तानची वाढती लोकसंख्या त्यातच भारतानं रोखलेलं सिंधू नदीचं पाणी यामुळे तिथल्या भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. विशेषत: उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या काळात या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाल्याने भारतामध्ये पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तान सोबतचे संबंध यामुळे प्रचंड ताणले गेले होते. नंतर या वाढत्या तणावामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला. सिंधू जल करार १९ सप्टेंबर १९६० रोजी दोन्ही देशांमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार पूर्वेकडील सतलज, व्यास आणि रावी या नद्यांचा समावेश भारतात झाला होता. तर,पश्चिमेकडील सिंधू, झेलम, चिनाब नद्या पाकिस्तानला मिळाल्या होत्या.
हेही वाचा : पाकिस्तान घेणार IS दहशतवाद्यांची मदत, भारताला हादरवून टाकण्याचा रचलाय कट; गुप्तचर अहवालाचा धक्कादायक खुलासा
सद्यस्थितीला भारताची एवढी क्षमता नाहीये कि नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखता येईल. मात्र, भारताचा छोटा निर्णय ही पाकिस्तानला महाग पडू शकतो. ज्यामुळे पाकिस्तानला मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. सिंधू नदीचा प्रवाह भारताने रोखल्यास पाकिस्तानकडे कोणताच पर्याय उरणार नाही. कृषी क्षेत्र, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, वीज उत्पादन अशाप्रकारे अडचणी निर्माण होतील.






