पाकिस्तानच्या लयारीमध्ये गुंड उझैर बलोचच्या भावावर गोळीबार, प्रकृती गंभीर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पाकिस्तानची (Pakistan )आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या कराची शहरातील अत्यंत संवेदनशील आणि कुख्यात अशा ‘लयारी’ (Lyari) परिसरात गुरुवारी संध्याकाळी एक थरारक घटना घडली. ‘पीपल्स अमन कमिटी’चा माजी प्रमुख आणि सध्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड उझैर बलोचचा भाऊ झुबेर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ४० वर्षीय झुबेर बलोच गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने कराचीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झुबेरच्या छातीवर आणि पोटावर गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गोळीबाराच्या घटनेत जवळून जाणारे दोन निष्पाप वाटसरूही जखमी झाले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी झुबेर बलोच लयारीतील सिंगू लेन परिसरातील आपल्या घराबाहेर बसला असताना ही घटना घडली. अचानक तोंडावर बुरखा किंवा मास्क बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी झुबेरच्या दिशेने पिस्तूलमधून सलग गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले. या दरम्यान एका स्थानिक दुकानदाराने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांवर गोळीबार केला, ज्यामुळे हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, पोलीस या भागातील सर्व कॅमेऱ्यांची पाहणी करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Spain Migrant: ‘घरे लुटली, रस्ते पेटवले’, सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय पडला महागात; स्थलांतरितांच्या हिंसाचाराने स्पेन हादरला
दक्षिण विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी (DIG South) सय्यद असद रझा यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, झुबेर बलोचला २०१२ मध्ये विविध गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो गेल्या वर्षी जानेवारीमध्येच तुरुंगातून सुटला होता. या गोळीबारामागे नक्की काय कारण आहे, याचा तपास पोलीस अत्यंत वेगाने करत आहेत. जुने टोळीयुद्ध, वर्चस्वाची लढाई की वैयक्तिक दुष्मनी, अशा सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
भारतीय प्रेक्षकांसाठी ‘उझैर बलोच’ हे नाव अगदी परिचित झाले आहे. याचे कारण म्हणजे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) या सुपरहिट भारतीय स्पाय थ्रिलर चित्रपटात लयारीतील अंडरवर्ल्ड, टोळीयुद्ध आणि उझैर बलोचची क्रूर कथा पडद्यावर दाखवण्यात आली होती. भारतीय अभिनेता दानिश पांडोर याने ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांमध्ये उझैर बलोचची भूमिका साकारून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. लयारीमधील एका साध्या वॉर्ड बॉयपासून ते कराचीच्या अंडरवर्ल्डचा ‘किंग’ बनण्यापर्यंतचा उझैर बलोचचा प्रवास रक्ताळलेला आणि गुन्हेगारीने भरलेला आहे.
उझैर बलोचवर हत्या, अपहरण, वसुली, पोलीस चकमक आणि स्फोटके बाळगणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एप्रिल २०२० मध्ये पाकिस्तानच्या एका लष्करी न्यायालयाने उझैर बलोचला हेरगिरीच्या (Espionage) प्रकरणात दोषी ठरवून १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. याशिवाय, या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) कलाकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१२ मध्ये कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांवर केलेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी उझैर बलोचचे जामीन अर्ज फेटाळले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Violence : नेपाळमध्ये धार्मिक तणावाचा भडका; जनकपूरसह 4 जिल्ह्यांत संचारबंदी लागू, 3 ठार तर 8 जणांना अटक
कराचीतील लयारी हा भाग गेल्या अनेक दशकांपासून अंमली पदार्थांची तस्करीत, खंडणी आणि टोळीयुद्धाचे केंद्र मानला जात आहे. रहमान डकैत (Rehman Dakait), अर्शद पप्पू (Arshad Pappu) आणि त्यानंतर उझैर बलोच यांनी लयारीतील गल्ल्यांवर आपले वर्चस्व गाजवले होते. २०१२ मध्ये पाकिस्तान पोलिसांनी आणि निमलष्करी दलांनी लयारीमध्ये गुन्हेगारांचा खात्मा करण्यासाठी एक ‘महामोहीम’ (Grand Operation) राबवली होती. सलग ५ दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत ६ पोलीस अधिकाऱ्यांसह २० जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे १५० कुटुंबांना लयारी सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते.
गेल्या काही वर्षांपासून ‘कराची ऑपरेशन’मुळे लयारीतील गुन्हेगारी काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. मात्र, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, झुबेर बलोच काही महिन्यांपूर्वी एका राजकीय पक्षात सामील झाला होता आणि त्याने परिसरात पक्षाचे झेंडे लावून आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर युएई (दुबई) आणि इराणला पळून गेलेले काही जुने गुंड पुन्हा लयारीत परतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर झुबेर बलोचवर झालेला हा हल्ला म्हणजे लयारीमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित टोळीयुद्ध (Gang War) सुरू होण्याचे संकेत मानले जात आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






