'रडगाणे गाऊन जनादेश बदलणार नाही'; PoK निवडणुकीवरून मरियम नवाज आणि बिलावल भुट्टो यांच्यात जुंपली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) पक्षाने मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, या निकालांनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत मोठा गदारोळ उठवला आहे. बिलावल यांच्या या आरोपांनंतर पंजाबच्या मुख्यमंत्री आणि PML-N च्या वरिष्ठ नेत्या मरियम नवाज यांनी थेट मैदानात उतरत बिलावल भुट्टो यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणुकीच्या या टप्प्यात PML-N ने ९ जागांवर विजय मिळवला, तर बिलावल भुट्टो यांच्या PPP ला मीरपूर भागातील १३ पैकी अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. आपल्या पक्षाचा झालेला हा दारुण पराभव पचवणे बिलावल भुट्टो यांना कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. निकालांनंतर बिलावल यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत धांदल आणि हेराफेरी झाल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून PPP च्या हक्काचे बहुमत हिरावून घेण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Rain Day 2026: निसर्गाचे जीवनदायी वरदान आणि धरणीची तहान भागवणारा सण; जाणून घ्या या खास दिवसाचे विशेष महत्त्व
बिलावल भुट्टो यांच्या या तक्रारींना उत्तर देताना मरियम नवाज यांनी एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला, जो सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. मरियम नवाज यांनी अत्यंत कडक शब्दांत बिलावल यांना सुनावले की, “लोकशाहीत जय आणि पराजय हा जनतेचा कौल असतो, तो सरकारी यंत्रणा ठरवत नाहीत.” बिलावल यांनी पराभव स्वीकारण्याऐवजी रडगाणे गाणे आणि तक्रारी करणे सुरू केले आहे, परंतु अशा त्राग्याने जनादेश बदलणार नाही. पीपीपीने अत्यंत नम्रतेने आणि सन्मानाने आपला पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केले पाहिजे.
CM Punjab Maryam Nawaz congratulated PM Shehbaz Sharif, Rana Sanaullah, Amir Muqam, and PML-N workers for securing 9 out of 13 seats in the AJK elections following a stellar campaign!
Addressing Bilawal Bhutto Zardari’s criticism, CM @MaryamNSharif emphasized that elections are… pic.twitter.com/D1QTb68PcT — Sania Ashiq (@SaniaaAshiq) July 28, 2026
credit – social media and Twitter
आपल्या भाषणात मरियम यांनी बिलावल यांच्या नेतृत्वावर आणि सिंध प्रांतातील त्यांच्या कारभारावरही जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या की, पीपीपी गेल्या १७ वर्षांपासून सिंध प्रांतात सत्तेवर आहे, परंतु तिथल्या रस्त्यांची दुरवस्था, कचऱ्याचे साम्राज्य आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था पाहता त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश होतो. संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान बिलावल भुट्टो यांच्याकडे जनतेला दाखवण्यासाठी आपल्या कामाचा कोणताही अहवाल किंवा भविष्यातील विकासाचा स्पष्ट आराखडा नव्हता. कामाचा अभाव लपवण्यासाठीच आता हेराफेरीचे खोटे आरोप केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Tiger Day: ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’; जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिना’निमित्त या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
केवळ मरियम नवाजच नव्हे, तर शाहबाज शरीफ सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांनीही बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी बिलावल यांचे दावे अलोकतांत्रिक आणि पायाहीन असल्याचे म्हटले आहे. तर केंद्रीय मंत्री तारिक फजल चौधरी यांनी स्पष्ट केले की, PML-N चा हा विजय स्थानिक जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये विकास, उत्तम आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा पुरवणे हेच आपल्या पक्षाचे मुख्य ध्येय असून, जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध राहील, असे आश्वासन मरियम नवाज यांनी शेवटी दिले.






