Pakistan Nuclear Threat : पाकिस्तानची दुहेरी खेळी! एकीकडे अणु युद्धाची धमकी; दुसरीकडे मुनीरचा भारतविरोधी मोठा डाव? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ही धमकी माजी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी दिली आहे. लष्करप्रमुख असिम मुनीर बुद्धाचा कट रचत असल्याचे वृत्त आहे. एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य करण्याचा त्यांचा हेतू आहे. पहिले म्हणजे, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांवरून लक्ष विचलित करणे. दुसरे म्हणजे, आंतरराष्ट्रीय पाठिंबा, विशेषतः अमेरिकेकडून पाठिंबा मिळवणे.
अशा परिस्थितीत चीनसह तुर्की पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करेल, असा त्यांना विश्वास आहे. कदाचित हा कट पार पाडण्यासाठी, नियंत्रण रेषेवर (एलओसी) अलीकडेच इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र आणि ड्रोनविरोधी यंत्रणा उभारण्यात आली आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानने या महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानच्या सीमेवरून पाच बटालियन हलवून त्यांना नियंत्रण रेषेवरील रावलकोट, कोटली आणि भीमबर या क्षेत्रांमध्ये तैनात केले आहे.
दरम्यान, सिंधू पाणी करारावरून भारतावर प्रचंड टीका होत आहे. पाकिस्तानचे माजी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री खुर्रम दस्तगीर खान म्हणाले की, दोन्ही देशांमधील पाण्याचा वाद खूप धोकादायक आहे. दस्तगीर खान म्हणाले, ‘जर भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानचा पाणीपुरवठा बंद केला, तर आम्ही ते कधीही स्वीकारणार नाही.
जर भारताने पाणीपुरवठा थांबवला आणि जगाने हस्तक्षेप केला नाही, तर पाण्यावरून होणारे हे कदाचित पहिले अणुयुद्ध असेल.’ ते पुढे म्हणाले की, आपण दोघेही अण्वस्त्रधारी शेजारी आहोत. आपण इतके जवळ आहोत की एकदा क्षेपणास्त्र डागले गेले की, आपल्याला विचार करायलाही वेळ मिळणार नाही.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला ड्रोनचा पुरवठा केल्यावर, तुर्कियेने आता कराचीजवळ एक संयुक्त लढाऊ ड्रोन असेब्ली कारखाना – उभारला आहे. तिथे दरवर्षी ७०० ड्रोन तयार केले जातील. पाकिस्तानने बांगलादेशला हे – ड्रोन निर्यात करण्यासाठी सामंजस्य करारावर – (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. तुर्किये पाकिस्तानसाठी मिलगेम-श्रेणीच्या पाणबुड्याही तयार करत आहे.






