इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला बसणार मोठा फटका; तब्बल 9 लाख कोटींचा व्यापार धोक्यात (फोटो सौजन्य: iStock)
नवी दिल्ली : सध्या इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराण वर संयुक्त हल्ले केले जात आहेत. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणने सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि ओमानमधील अनेक ऊर्जा आणि रसद सुविधांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे तेल आणि वायू पुरवठ्यात व्यत्यय येण्याचा धोका वाढला आहे. युद्ध लांबले तर पेट्रोल आणि डिझेल, गॅस, खते, प्लास्टिक आणि हिरे यांसारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
भारत दरवर्षी या प्रदेशातून अंदाजे ९ लाख कोटींहून अधिक किमतीच्या वस्तू आयात करतो. जर पुरवठा खंडित झाला तर त्याचा परिणाम सामान्य लोकांपासून उद्योगांपर्यंत सर्वांना जाणवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारत आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पूर्णपणे आखाती देशांवर अवलंबून आहे. तेल आणि वायूचा या भागातून भारतात पुरवठा होतो. ७० अब्ज डॉलर्स किमतीचे पेट्रोलियम मध्य पूर्वेतून येते. त्यात कच्च्या तेलाचा वाटा ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जर पुरवठ्यात व्यत्यय आला तर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. याचा परिणाम वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि शेतीवरही होईल.
हेदेखील वाचा : खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप
दरम्यान, भारत मध्य पूर्वेतून मोठ्या प्रमाणात खत खरेदी करतो. २०२५ मध्ये भारताने अंदाजे ३.७ अब्ज डॉलर्स किमतीचे खत आयात केले. जर हा पुरवठा खंडित झाला तर खताच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे सरकारचा अनुदानाचा भार वाढू शकतो. याचा अन्नधान्याच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो.
स्वयंपाकाच्या गॅसवर परिणाम
भारताच्या इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या वायू याच प्रदेशातून येतो. भारतातील एलएनजी पुरवठ्यापैकी सुमारे ६८ टक्के पुरवठा मध्य पूर्वेतून होतो. कतारच्या सर्वांत मोठ्या वायू निर्यात केंद्रावर हल्ला झाल्याने या देशाने उत्पादन पूर्णणे थांबवले आहे. भारताच्या एकूण एलपीजी आयातीच्या प्रमाणांपैकी मध्य पूर्वेतून प्रमाण अंदाजे ४७ टक्के आहे. जर पुरवठा दीर्घकाळ खंडित राहिला तर देशभरातील लाखो घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसवर परिणाम होऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
खामेनेई यांच्या मृत्यूवर भारताने व्यक्त केला शोक
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर भारतात निदर्शने तीव्र झाली. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनाबद्दल केंद्र सरकारला (Central Goverment) शोक का व्यक्त केला नाही असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नांच्या दरम्यान, भारताने आज इराणबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी दूतावासाला भेट दिली, जिथे त्यांनी अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि शोक नोंदवहीवर स्वाक्षरी केली.






